पुणे (प्रतिनिधी): मुळशी तालुक्यातील उरवडे येथे एसव्हीएस कंपनीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून १७ कामगारांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने तज्ज्ञांची एक समिती नेमून त्यांच्यामार्फत या घटनेमागील घटकांची चौकशी केली आहे, त्याचा अहवाल समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला.
या अहवालाची गंभीर दखल घेऊन शासनाने या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर ग्रीन ट्रायब्युनल समिती नेमली आहे. तसेच राज्य सरकारपुढे हा अहवाल सादर करावा तसेच या अहवालातील निष्कर्ष या बाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, त्यासाठी सर्व संबंधित खात्यांच्या प्रमुखांची कामगार संघटनांच्या प्रतिनिधी समवेत तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी या वेळी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली.
भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, सिटूचे अजित अभ्यंकर, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, राष्ट्रवादी कामगार सेलचे अरुण बोराडे, कैलास कदम, मनोज पाटील, वसंत पवार, मनोहर गडेकर, विमा कामगार संघटनेचे चंद्रकांत तिवारी, अनिल सोहम हे यावेळी उपस्थित होते.
उरवडे येथील एसव्हीएस कंपनीमधील आगीमुळे सर्व कामगार कायद्याचे आणि खास कारखाना आणि सुरक्षा अधिनियमांचे वर्षानुवर्षे मालक व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक उल्लंघन होत आहे. त्यामुळे ही घटना घडली, यामध्ये संबंधित सरकारी विभागांचे अधिकारी आणि मालक यांच्याशी असलेले संगनमत यामुळेच अशा घटना घडत असल्याचे कृती समितीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.