स्पर्धा परीक्षा देताना घरची परिस्थिती आड येऊ देऊ नका – राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
पिंपरी :आपल्या घरची परिस्थिती आपल्या यशाच्या आड येत नाही, उलट आपणाला यश खेचून आणण्यासाठी हीच परिस्थिती सामर्थ्यवान ठरवते. आजपर्यंत स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्यांकडे पाहिले, तर यातील बहुतांश जण ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आहेत. त्यामुळे घरची परिस्थिती, ग्रामीण आहोत अशी कोणतीच कारणे पुढे न करता तुम्ही जिथे आहात तिथून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागा, असा सल्ला राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सोलंकी यांनी उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावरील व्याख्यानात सोलंकी बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, शैलेश शहा, दीपक शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, निरुपा कानिटकर, संदीप काकडे आदी उपस्थित होते. दरम्यान, गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सोलंकी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सोलंकी म्हणाले, की कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा असे कोणतेही क्षेत्र निवडून शक्य तितक्या लवकर सुरुवात केली आणि योग्य नियोजन करून जेव्हा स्वतःशी स्पर्धा कराल, तेव्हा यश तुमच्यापाठीमागे धावत येईल. तयारी करत असताना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. तयारी करत असताना सुरुवातीची एक दोन वर्षे झोकून देऊन अभ्यास केला पाहिजे. म्हणजे पुढे परीक्षेच्या अगोदर जास्त ताण येणार नाही. पाया पक्का केला तर पुढे अडचणी येत नाहीत. कुणी सांगितले म्हणून स्पर्धा परीक्षा देऊ नका. स्वतःला ओळखा. कारण प्रत्येकात वेगवेगळी क्षमता असते. तुम्हाला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, हे ठरवणेही तितकेच महत्वाचे आहे.
आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्यांच्या स्वप्नाचा दबाव स्वतःवर ठेवून हे क्षेत्र निवडू नका. खासगी क्लासेस लावल्याचा एक फायदा होतो, की एक दिशा मिळते, अभ्यासासाठी एक ग्रुप तयार होतो, पुस्तकांची माहिती मिळते, वातावरण मिळते. पण फक्त सहा महिने ते एक वर्षापर्यंत क्लास लावावा. त्यानंतर स्वतःचे मूल्यमापन करीत अभ्यासावर भर द्यावा. आपला अभ्यास योग्य दिशेने सुरू आहे की नाही हे तपासून पाहावे. सरावावर भर द्यावा. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही सोलंकी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण –
भारतीय शिक्षणपद्धतीत त्रुटी जरूर आहेत, पण चांगल्या बाबीही आहेत. पाश्चात्य देशातील शिक्षणपद्धतीत प्रोजेक्टवर जास्त भर दिला जातो, हाच प्रयोग आपल्या शिक्षणात करण्यात येत आहे.जगतिकीकरणाच्या वेगाबरोबर अभ्यासक्रमाचा वेगही वाढविणे गरजेचे असते. आपल्याकडे एससीआरटी आणि बालभारती हे अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्याही हे काम सुरू आहे.
महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड स्थापण करण्यात आले असून, या माध्यमातून जगात जे चांगले आहे, ते आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येत आहे. या अंतर्गत शाळा अद्ययावत केल्या जाणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येत आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 100 शाळांचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, हा हेतू या पाठीमागे आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा हेतू आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेतही तो मागे पडणार नाही .