पिंपरी –
आज काही शक्ती संविधान नाकारण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. त्यांना येथे विषमतेवर आधारीत व्यवस्था निर्माण करावयाची आहे. जातीव्यवस्था टिकविण्याचे कटकारस्थान सध्या सुरु आहे. माणसाचे माणूसपण जपणे आणि माणुसकी समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर, संत तुकाराम महाराज, फुले-शाहू-आंबेडकर आदी महामानवाची आदर्श शिकवण आपण स्वीकारली तरच देशाचा पर्यायाने मानवतेचा विकास साध्य होईल, असे प्रतिपादन नागपूर येथील भंते विमलकित्ती गुणसिरी यांनी केले.
धम्म चळवळ गतिमान करण्यासंदर्भात पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात एक दिवसीय प्राज्ञजन परिषदेचे आयोजन पिंपळे गुरव येथील गुरुशोभा सामाजिक व क्रीडा संस्थेने संबुद्धभूषण सेवा संघ, बुद्ध विहार पिंपळे गुरव, लुंबिनी बुद्ध विहार औंध कॅम्प, चंद्रमणीनगर बुद्ध विहार सांगवी, समता बुद्ध विहार सांगवी, सिद्धार्थ सेवा संघ बुद्धविहार पिंपळे गुरव, भूमिपुत्र बुद्ध विहार नवी सांगवी, बुद्धघोष सोसायटी बुद्ध विहार सांगवी, युगप्रवर्तक संघ नवी सांगवी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. याप्रसंगी कार्याध्यक्षा सुजाता निकाळजे, सचिव अॅड. राजेश नितनवरे, माजी अध्यक्ष अमरसिंग आदियाल, माजी कार्याध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, संदिप खुंटे, विजय चौधरी, चंद्रकांत वाकोडे, डॉ. शशिकांत वग्गे, सी.आर. गायकवाड, अॅड. विलास गायकवाड, पंकज कांबळे, महेंद्र कदम, नयन आहिरे, अरविंद कसबे, विनायक जाधव, जी.आर.कांबळे, विलास भालेराव, सुशिला काकडे, इंदुमती पवार आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील मोट्या प्रमाणात उपासकांची उपस्थिती होती.
भंते विमलकित्ती गुणसिरी म्हणाले, बुद्धीमान वर्गाने संघटीत होऊन कार्य करण्याची गरज आहे. आज आपल्याला परिवर्तनाची दिशा संविधानिक मार्गाने ठरवावी लागेल. विषमता नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित व्हावी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूलतत्वाचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे. बौद्ध धम्म हा परिवर्तनाचा मार्ग आहे. भारतीय संविधानामुळेच देशाचा विकास होईल. बौद्ध धम्माचे संस्कार अंगीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आचरण करणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी बौद्ध धम्माची दिक्षा घेणे आवश्यक आहे. करुणाकार, दानवीर अशी नावे धारण करून जात मोडीत काढून समाजाने एकत्र येऊन सर्वांचा सर्वांगीण विकास साधणे म्हणजेच प्रज्ञाजन परिषद होय.
त्यांनी पुढे सांगितले, की बुद्ध धर्म परिवर्तनाचा मार्ग आहे. इमानदारी नसेल, तर माणूसपण राहत नाही. त्यामुळे कुटुंबात इमानदार राहा, ही बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण अवलंबण्याचे आवाहनही उपासकांना केले.
ही परिषद तीन सत्रात पार पडली. पहिल्या सत्रात त्रिसारण पंचशील आणि दीपप्रज्ज्वलन झाल्यानंतर भंते विमल कित्ती गुणसिरी यांनी उपासकांना मार्गदर्शन केले. दुसर्या सत्रात शिबिरार्थी संवाद आणि भविष्यातील कार्यक्रमाचे नियोजन आणि तिसर्या सत्रात शिबिराचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक समिती सल्लागार राहुल काकडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला तथागत गौतम बुद्धाचा धम्म 1956 च्या धर्मांतरानंतर संपूर्ण भारतात रुजला का ? धम्माचे संस्कार बौद्ध धर्मियांवर रुजले का ? खरंच आपण बौद्ध झालो का ? बौद्ध समाज संघटीत असावा, बौद्धांमध्ये ऐक्य, सामंजस्य, बंधुता, प्रेम असावे. गौतम बुद्धांनी त्यासाठी काही संस्कार दिले आहेत. त्यातीलच प्राज्ञजन परिषद हा एक संस्कार आहे. जेणेकरून समाज संघटित, सामर्थ्यवान होतो. म्हणून त्याची सखोल माहिती घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्राज्ञजन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 2008 ची प्राज्ञजन परिषद नागपूर येथे सुरु केली. बौद्ध धर्माच्या सामाजिक प्रश्नाची उकल व्हावी, या हेतूने बौद्ध काळामध्ये गणपरिषद होत असत. त्याचप्रमाणे प्राज्ञजन परिषद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी विचारप्रणाली याद्वारे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.