पुणे- दोन महिने मुलाच्या काळजीने जीवात जीव नव्हता. आता माझा मुलगा सुखरुप घरी पोहचला. दीपकभाऊ मानकर तुमचे खूप खूप आभार. अशा शब्दात उत्तर प्रदेशातील चित्रकुट जिल्ह्यात राहणा-या एका आईने आपल्या भावना व्हाट्सएप वरुन व्हिडिओ द्वारा व्यक्त केल्या आहेत.
उत्तरप्रदेश मधून चार वर्षापूर्वी पुण्यात आलेला दिपक तिवारी कोथरुडमध्ये वॉचमनचे काम करत होता. सगळे सुरळीत चालू असतानाच कोरोना आला.
लॉकडाऊनमुळे आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला. मदत मिळत असल्याने जेवणाची अडचण नसली तरी घरचे चिंतेत होते. त्यामुळे दिपकसह त्याच्या दहाबारा मित्रांनाही घरची ओढ लागली होती.
लॉकडाऊनमुळे सगळे मार्ग बंद होते. स्थानिक नगरसेवक , माजी उपमहापौर दिपक मानकर यांची भेट घेवून तिवारी यांनी आपली समस्या मांडली. मानकरांनी या कामगारांना धीर देत पुण्यातच राहण्याविषयी सुचवले. परंतु हे कामगार घरच्यांच्या काळजीने अधिकच व्यथीत झाले होते. त्यांच्या भावुकतेचा विचार करत या कामगारांच्या गावी जाण्याची सोय मानकरांनी केली. एवढेच नव्हे तर वाटेत जेवायला अडचण येवू नये म्हणून सोबत काही पैसे व जेवणाची पाकीटेही दिले.
कामगाराची आई असलेल्या, रेखा तिवारी म्हणाल्या की, रुपवली गावात आमची चार बीघे जमीन आहे. पण त्यामध्ये भागत नाही. माझा मुलगा पुण्यात कामासाठी गेला. त्याची खुशाली फोनवरून कळायची. पण कोरोना आला आणि मुलाला केव्हा भेटेन असे झाले. मी सुध्दा मूळ महाराष्ट्रातीलच आहे. नागपूरातील रामनगर हे माझे माहेर. माझ्या महाराष्ट्रातील पुणेकर भावाने माझ्या मुलाला सुखरुप पोहचवले. मी खुप आभारी आहे.
दिपक तिवारी महाराष्ट्रातील लोकांनी मला एवढे प्रेम दिले की मी पुन्हा येईन.
नगरसेवक दिपक मानकर म्हणाले की, लवकरच ही परिस्थिती सुधारेल असा धीर आम्ही कामगारांना देत होतो. परंतु त्यांच्या घरच्यांचे पण आम्हाला फोन यायला लागले म्हणून आम्ही बस व रेल्वेने या कामगारांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली. उत्तर प्रदेश, तेलंगणा, कोलकत्ता या भागातील कामगारांनी घरी पोहचल्यावर सुखरुप घरी आलो आहे असे त्यांनी आठवणीने कळवले. कठीण प्रसंगातही मानवतेचे नाते जपले पाहिजे.