नागपूर- राज्यात छूप्या मार्गाने विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
यासंदर्भात डॉ. संतोष टारफे, श्रीमती निर्मला गावीत, कुणाल पाटील, अमिन पटेल, डी. पी. सावंत, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य सदस्यांनी मुंबईसह राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात श्री.बापट यांनी म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात कारवाई केली जाते.
सी.बी.कंट्रोल आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली असून, दि. 3 ऑक्टोबर, 2017 रोजी 28 लाख 87 हजार 150 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर 4 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत अनुक्रमे 12 लाख 65 हजार आणि 9 लाख 31 हजार 460 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या लातूर कार्यालयाने 27 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत 42 लाख 12 हजारांचा प्रतिबंधीत अन्नसाठा जप्त केला आहे. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे 10 लाख रुपये किंमतीचा परराज्यातून विक्रीस येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे.अशा प्रकारे सुमारे एक कोटी दोन लाख 96 हजार 210 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
हाफकिन महामंडळ फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार
पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिक स्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी हाफकिन महामंडळात पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले की, पोलिओ निर्मूलनासाठी लस निर्मितीच्या कामात हाफकिनचे मोठे कार्य आहे. पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक मुद्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमण्यात आली असून तीन महिन्यात या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी भाग घेतला.
29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर
राज्याच्या 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करुन द्वारपोच धान्य योजना सुरु आहे. वाई येथे खासगी गोदामात सार्वजनिक वितरणाचे धान्य छापा टाकून जप्त केल्या प्रकरणाची पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
वाई, जिल्हा सातारा येथे अवैध विक्रीकरिता पाठविण्यात येत असलेले धान्य जप्त केल्याबाबत सदस्य शंभूराजे देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले की, वाई येथील औद्योगिक विकास महामंडळालगतच्या खासगी जागेतील पत्र्यांच्या शेडमधून 9 हजार 300 किलो गहू व 2 हजार 150 किलो तांदूळ असा माल संयुक्त कारवाईत पकडण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
शिधापत्रिकांना आधार जोडणीच्या कामात सातारा जिल्हा पूढे आहे, असे सांगत श्री. बापट पुढे म्हणाले की 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस यंत्रणेचा वापर करीत धान्य पुरवठा केला जात आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, अजित पवार, भिमराव धोंडे यांनी भाग घेतला.