– महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेले मजूर तसेच नोकरी व काम-धंद्यासाठी आपले मुळगाव सोडून शहरांकडे आलेल्या लोकांची त्यांच्या मूळगावी जाण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या मूळ निवासस्थानी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती कोकण महसूल अयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबविलेल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा व परिणामकारक असा उपाय म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन घोषित केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात आटोक्यात आला असल्याचे दिसून आले आहे. परंतु याच लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील मजूर ज्या ज्या ठिकाणी कामाकरिता गेले होते ते त्या त्या ठिकाणीच अडकून पडले. कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अडकून पडलेले नागरिक आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे. कोकण विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधून परराज्यामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता निश्चित कार्यपद्धती अवलंबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यामध्ये सध्या विविध कॅम्पमध्ये जे मजूर आहेत त्यांच्याबाबतीत ते ज्या राज्यातील निवासी आहेत अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मजूरांच्या यादीसह संपर्क साधून त्यांची सहमती घेण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून सहमती मिळल्यानंतर या मजूरांना वाहनाद्वारे त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जावू इच्छित असतील, अशा व्यक्तींनी प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करुन संबंधित जिल्ह्यातील e-Pass या ॲपवर अर्ज करावा. विभागातील जिल्ह्यांमधून बाहेर राज्यामध्ये जाणाऱ्या कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी खालील प्रमाणे जिल्हानिहाय लिंकवर माहिती भरावी.
माहिती भरण्यासाठी संपर्क क्रमांक
ठाणे- https://covid19.mhpolice.in ०२२- २५३८१८८६/२५३०१७४०/२५३८१८८६/२५३०१७४०
पालघर – http://c19trformpalghar.webstag.net/ ०२५२५- २५२५२० / २९७४७४
रायगड – https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5 ०२१४१-२२२११८
रत्नागिरी – https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6 ०२३५२- २२२२३३ / २२६२४८
वरील लिंक मध्ये माहिती भरल्यानंतर तसेच e-Pass या ॲपद्वारे अर्ज केल्यानंतर परराज्यात जावू इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवार, दि.३ मे, २०२० पासून परवानगी देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने ते सध्या जेथे राहत आहेत तेथील नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय किंवा नोंदणीकृत खाजगी दवाखाना येथे संपर्क साधून संबंधित डॉक्टरकडून स्वत:ची तपासणी करुन घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे बंधनकारक राहील व ते वैद्यकीय प्रमाणपत्र प्रवासादरम्यान स्वत: सोबत बाळगणे तसेच स्वत:स १४ दिवस गृह विलगीकरण (Home Quarantine) करुन घेणे बंधनकारक असणार आहे.
जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्याप्रमाणे कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांनी केले आहे.

