पुणे : विनम्रता,साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि नैतिकता या जोरावरच जेआरडी. टाटा यांनी विश्वव्यापी उद्योगसमूह वृद्धिंगत केला. असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी व्यक्त केले. टाटा यांच्या स्मृतिदिनानिमित्त घोले रोड येथील महात्मा फुले वास्तुसंग्रहालयात ‘टाटा एडमारर’ ग्रुप च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, किर्लोस्कर इंजिन ऑइलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र देशपांडे, माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे,यांच्यासह ‘टेल्को’ मधील निवृत्त कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्रदीप भार्गव यांनी आपल्या भाषणात भारतीय उद्योग आणि औद्योगिक नीतिमत्ता याविषयी भाष्य केले. त्यात टाटा उद्योग आणि ओद्योगिक समूह आणि किर्लोस्कर या दोन उद्योगसमूहातील सामाजिक बांधिलकी व नीतिमत्ता या मुद्द्यांचा परामर्ष घेतला. यावेळी ते म्हणाले, मी माझी अभियंत्याची पदवी ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेमधून घेतली आहे. ही संस्था स्थापन करण्यापाठीमागे टाटांच्या मोठा वाटा होता. जे आर डी टाटा या संस्थेच्या कारभारात स्वतः लक्ष घालत असत. माझ्या विद्यार्थी दशेत जेआरडी टाटांनी काही वेळा जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जे.आर.डी टाटा यांची नम्रता आणि साधेपणाचे दर्शन घडले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हेच पैलू टाटा उद्योग समूहाच्या नैतिक तत्वामध्ये दिसून येते असे भार्गव म्हणाले. हरित ऊर्जा संबंधी बोलताना महाराष्ट्रातील लोडशेडिंग बंद करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न व त्यामध्ये किर्लोस्कर व टाटा समूह यांनी फायद्या तोट्याचा विचार न करता केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
टेल्कोतल्या अनुभवाविषयी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, टेल्कोमध्ये मला खूप शिकायला मिळालं. मंत्र्यांनी आपल्या कामकाजात कसं पुढं जावं आणि आपली वागणूक किती नम्रतेची असावी याच शिक्षण मला टेल्कोमध्ये मिळाले. टेल्को माझ्या जीवनातून वजा केल्यास मी शून्य आहे. टेल्कोमध्ये मी कार्डेक्समध्ये काम करायचो. तेथे प्रत्येक वस्तूला कोड नंबर होता. त्यामुळे कार्डाप्रमाणे कोड नंबर पाठ होते. त्या पाठांतराची सवय लागली. जशी वस्तू कार्ड वाचून आम्ही ओळखु लागलो तसा समाजात फिरताना माणस वाचून त्यांची नावं ओळखू लागलो. ‘टेल्को’मधल्या उपहार गृहात अधिकाऱ्यांपासून कामगारापर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी नाष्टा करावा लागत असे. ते ही नाष्टा घेण्यापासून ताट ठेवण्यापर्यंत सर्व कामे स्वतःला करावी लागत हीच सवय आम्हाला लागली. आज मंत्री म्हणून मी समाजात वावरत असताना एखाद्या कार्यक्रमात गेलो कोणी चटणी भाकरी खात असेल तर ती चटणी भाकरी हातात घेऊन मी खातो. टेल्को मध्ये काम केल्यानंतर सामान्य माणसांच्यात काम करताना माझी निर्णय घेण्याची क्षमता वाढली. यावेळी काम करताना त्या शिफ्ट मधील काम त्याच वेळी पूर्ण करावे लागत होते. या सवयी मुळे आज मंत्री म्हणून काम करताना काम प्रलंबित न ठेवता ज्या त्या दिवशी त्या कामाचा निपटारा करण्याची म्हणजेच झिरो पेंडंसीची सवय लागली.
सत्तेत आल्यानंतर राज्यात आम्ही अनेक महत्त्वाच्या विषयावर काम करत आहोत. शेती आणि औद्योगिकरण हे त्यातील दोन महत्वाचे विषय आहेत. सरकार म्हणून या दोन विषयात लक्ष घालत आहोत. आज देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. मुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्र्यांच्या प्रयत्नातून राज्य औद्योगिकरणामध्ये प्रगती करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रदीप भार्गव व राजेंद्र देशपांडे यांच्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी ही असे कार्यक्रम करणे आवश्यक आहे. असेही श्री बापट म्हणाले.
कामगार आणि व्यवस्थापन यांच्या मधील संबंध या विषयावर बोलताना राजेंद्र देशपांडे यांनी कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यातील समन्वय साधने आवश्यक असते. मत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत बाबा राणे यांनी केले.सूत्र संचालन सुनील शिरोडकर यांनी तर आभार प्रदर्शन आणि समारोप श्रीकांत देव यांनी केले.