मुंबई-आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. हा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. २०१९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. ‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं’ असे अशोक चव्हाण म्हणाले.
आता मोदी लाट ओसरली असून देशात मोदींच्या नेतृत्वाचा प्रभाव जाणवला नाही असे ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर करडी नजर ठेवल्यामुळे भाजपाला मतदान यंत्रात फेरफार करणे शक्य झाले नाही असा दावा त्यांनी केला. हा निकाल म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती प्रभावी ठरली असेच म्हणावे लागेल.
महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या मुद्यांवर भाजपाचे सरकर सपशेल अपयशी ठरले असे ते म्हणाले. हा हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. भाजपा मोजक्या उद्योगपतींसाठी सत्तेचा वापर करतं होतं असा आरोप त्यांनी केला. हा हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. तिरस्कारावर प्रेमाचा आणि अहंकारावर नम्रतेचा विजय आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.
हा लोकविरोधी भाजपा सरकारच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. महाराष्ट्रातील फडणवीस सरकार फक्त आता काही महिन्यांपुरता आहे. महाराष्ट्रातही तुम्हाला हाच कल दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इव्हेंट, जाहीरातबाजी करुन काही काळासासाठी जनतेची दिशाभूल करता येते असे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.