सोलापूर, दि. ७ डिसेंबर – सोलापूरच्या विकासासाठी हे सरकार बेफिकीर असून गेल्या २ वर्षात या सरकारने सोलापूरच्या विकासासाठी एक नवा रुपया दिलेला नाही. अशा प्रकारे जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झाले आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका दुर्दैवाने सोलापूरला बसल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले प्रविण दरेकर यांनी सोलापूर शहराच्या विकासाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरामध्ये रस्त्याची कामे सुरू होती. दुहेरी पाणीपुरवठा पाईपलाईनच्या योजना होत्या. त्याही ठप्प आहेत. स्मार्ट सिटीचे काम पूर्णतः ठप्प आहे. उलट ते कसे होणार नाही याची काळजी सरकारी यंत्रणा घेताना दिसत आहे. पूर्णपणे रजकीय अनास्था आहे. आपापल्या पक्षांमध्ये विसंवाद आहे. पालकमंत्री केवळ नाममात्र आहेत असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका घेऊन विकास करण्याची आवश्यकता आहे. एखादा सरकारी अधिकारी बैठक घेतो आणि निघून जातो. परंतु इथल्या लोकांची सुख-दु:खे खोलवर जाऊन त्यातून मार्ग काढण्याची तसदी पालकमंत्री घेताना दिसत नाहीत. कॉँग्रेसचे वेगळे चालले आहे, राष्ट्रवादीचे वेगळे चालले आहे. शिवसेना तर इथे दिसतच नाही असेही दरेकर यांनी सांगितले.