भाजपच्या बापटांना शह देण्यासाठी कॉंग्रेसकडून अरविंद शिंदे …
पुणे-भाजपच्या गिरीश बापटांची उमेदवारी निश्चित होत असताना दुसरीकडे कॉंग्रेस ने बापटांना लढत देण्यासाठी महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे यांची निवड केल्याचे वृत्त हाथी आले आहे . ‘अरविंद शिंदेंचे नाव आघाडीवर, पण संजय काकडेंसाठी दरवाजे खुले ‘ या शीर्षकाखाली २२ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘मायमराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते .
आता हे दरवाजे खुले असतानाही काकडे यांना माघारी वळविण्यात भाजपचे अंतर्गत राजकारण यशस्वी झाल्याचे मानले जाते आहे.पुणे जातीयवादापासून दूर राहणारे शहर आहे असे मानले तर, हि लढत ब्राम्हण विरुद्ध मराठा अशी होणार नाही, तर ती पक्षाची धोरणे ,नरेंद्र मोदी आणि गांधी घराणे ,तसेच उमेदवारांची कार्यपद्धती अशा मुद्द्यांवर होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
पुणे लोकसभेसाठी अद्याप दोन्ही पक्षांनी अधिकृतरित्या आपापले उमेदवार जाहीर केलेले नाहीत पण रोजच्या बदलत्या राजकीय वातावरणाची चाहूल मात्र लागते आहे. सलून वाल्यापासून ते सोने चांदी विक्री करणाऱ्या सराफा पर्यंत वेगवेगळ्या मंदिरांपासून ते थेट अजमेरच्या दर्ग्या पर्यंत पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत यश मिळावे या साठी गेली वर्षभर राबलेल्या काकडे यांनी, घेतलेली मेहनत आता बापटांच्या पथ्यावर पडणार काय ? हा खरा प्रश्न आहे .
बापट विरुद्ध अरविंद शिंदे अशी सरळ लढत होईल असे मानले तर १९९८ च्या सुरेश कलमाडी विरुद्ध विठ्ठल तुपे पा. अशा लढतीची आठवण कार्यकर्त्यांना होऊ शकेल . सध्या बापटांच्या पाठीशी भाजप सेना युतीच्या 100 हून अधिक नगरसेवकांची फौज उभी राहील .आणि सात हि आमदार त्यांच्या पाठीशी राहतील तर शिंदे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा आधार मिळणार आहे.या दोन्ही पक्षांचे मिळून महापालिकेत ५० नगरसेवक आहेत .आमदार मात्र कोणी नाही .कॉंग्रेसचे विठ्ठल तुपे आणि विकास आघाडीचे सुरेश कलमाडी यांच्यात झालेल्या लढतीत तुपे पाटील 1 लाख ७० हजार मतांनी विजयी झाले होते .तेव्हा हि कॉंग्रेस ची महापालिकेतील नगरसेवकांची संख्या अत्यल्प होती. भाजप सेना आणि विकास आघाडीचे सुमारे ७० नगरसेवक कलमाडींच्या पाठीशी होते तर कॉंग्रेस चे अवघे 9 ते 10 नगरसेवक विठ्ठल तुपे पाटील यांच्या पाठीशी असताना पाटलांनी हा घवघवीत विजय मिळविला होता . याची पुनरावृत्ती आता होऊ शकेल काय यावर मंथन होऊ शकणार आहे
बॅरीस्टर विठ्ठलराव गाडगीळ ,अण्णा जोशी अशा ब्राम्हण समाजाच्या खासदारांनंतर बऱ्याच कालावाधीनंतर प्रथमच ब्राम्हण समाजातील बापट लोकसभेच्या रिंगणात आले आहेत. हा समाज एकसंघ त्यांच्या पाठीशी राहील आणि या शिवाय अन्य समाजातील मतदार वळतील अशी मंडळी पक्षाने त्यांच्या सोबत दिली आहेत .मात्र बापटांची एक खासियत अशी हि आहे कि त्यांनी कायम वरिष्ठ स्तरावरील नागरिकांशी आपला सुसंवाद ठेवला.हि मंडळी निश्चित त्यांच्या पाठीशी राहतील . पण सामान्य मतदार ,सामान्य माणूस ते आपल्याकडे आता तरी आकर्षित करतील काय ? केलाच तर कशा पद्धतीने करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर अरविंद शंदे यांचा संपर्क जास्तीत जास्त बहुसमावेशक असा आहे .त्यांना निवडणुकीसाठी मिळणारी रसद तशी बापटांच्या तुलनेत लक्षवेधी नाही . महापालिकेच्या सभागृहात भाजपचे बहुमत असतानाही त्यांनी प्रकर्षाने मांडलेली आपली मते ,विशेष हतोटीने करवून घेतलेली विकास कामे, चव्हाट्यावर आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे ,आणि हि प्रकरणे रोखण्यासाठी केलेल्या कौशल्यपूर्ण यशस्वी हालचाली हि अरविंद शिंदेंची खासियत बहुसंख्य लोकप्रतिनिधी ,माध्यमे आणि काही प्रमाणात पुणेकर जाणून आहेत .राहुल गांधी ,प्रियांका गांधी यांच्या प्रत्येकी रॅली सह एक एक सभा तरी त्यांना विजया साठी घेणे आवश्यक ठरणार आहे .रमेश बागवे यांचे कट्टर समर्थक ,अविनाश बागवेंचे पालिकेतील सहकारी अशी ओळख असल्याने बहुजन दलित वर्ग त्यांच्या पाठीशी राहील असे दिसते आहे.