मुंबई-भीमा कोरेगाव येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी फर्मावले. दरम्यान, भीमा कोरेगाव येथील घटनास्थळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत पुण्याचे पोलिस अधिक्षक सुवेझ हक उपस्थित होते. त्यांनीही दोषींवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.
भीमा कोरेगावच्या दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळे या तरूणाच्या कुटुंबियांना दहा लाख रूपये देण्याची घोषणा फडणवीस व केसरकर यांनी केली. तसेच जखमींनाही मदत करण्याचे जाहीर केले. ज्यांच्या गाड्यांचे, मालमत्तेचे व दुकानाचे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत केली जाईल असे केसरकर यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले. नुकसानीचा आढावा घेतला जाईल त्यानुसार कार्यवाही होईल असे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील वढू ब्रुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झाल्यानंतर विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर काल (सोमवारी) सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. दोन गटात वाद झाल्याने घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने जाळणे व मालमत्तेचे नुकसान करण्यात झाले. यावेळी पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापूरी या भागात अनेक वाहनांची व दुकानांची नासधूस व तोडफोड करण्यात आली. या घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. सायंकाळनंतर हा तेथील तणाव नियत्रंणात आला. राहुल फटांगळे (२८) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.
वढू बुद्रूक येथे शुक्रवारी नामफलक लावण्यावरून निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद सोमवारी पेरणेफाटा (ता. हवेली) येथे उमटले. पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव- भीमा, सणसवाडी, शिक्रापूर कोंढापुरी येथे संतप्त जमावाने दगडफेक करुन ३५ वाहनांचे नुकसान केले. या तणावपूर्ण वातावरणामुळे नगर पुण्याकडे जाणारी वाहने दाेन्ही बाजूला थांबविण्यात अाली हाेती. त्यामुळे अनेक प्रवाशी वाहनातच अडकून पडले. पाेलिसांनी वेळीच बंदाेबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात अाणली. या घटनेनंतर राज्यभर अफवांचे पीक पसरले. त्याचे पडसाद अाैरंगाबाद, माजलगाव, परभणी, साेलापूर अादी शहरातही उमटले. अाैरंगाबादेतील उस्मानपुरा, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, टाऊन हॉलसह अनेक भागात जमावाने दुकाने बंद केली. काही वाहनांवर दगडफेकही केली. पाेलिसांनी बंदाेबस्तात वाढ केल्याने शहरात रात्री तणावपूर्ण शांतता हाेती.