पुणे दि.२२: नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेतील पहिला टप्पा ३१ जुलै २०२२ पर्यंत आहे. थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकीत शास्ती या संबंधी ३१ मार्च २०२२ पूर्वी नोटीस प्राप्त झालेले मात्र अद्याप या योजनेचा फायदा घेतला नाही अशा पक्षकारांनी तात्काळ सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व या दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पक्षकारांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील ९० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. अन्यथा या पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकीत शास्तीवर ५० टक्के दंड भरावा लागणार आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलमान्वये मुद्रांक शुल्क शास्ती संदर्भात ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांना माफी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजना १ एप्रिलपासून सुरू झालेली असून ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. माफी योजना मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे.
मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम ३१ जुलै २०२२ पर्यंतच्या कालावधीत भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट मिळणार आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत ५० टक्के सूट मिळणार आहे.
योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटरशी ८८८८००७७७७ वर किंवा complaint@igrmaharashtra.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.