पुणे : ”महाविकास आघाडीतील बिघाडीमुळे कॉंग्रेस पक्ष एक दिवस सरकारचा पाठिंबा काढून घेईल. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्यासोबत येऊन आम्ही सत्ता स्थापन करू,” असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकार चालविताना मोठी कसरत होत आहे, असेही ते म्हणाले.
पुणे येथील पत्रकार परिषदेत रामदास आठवले होते बोलत होते. रिपाइचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राज्य सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
कॉंग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकरी कायदा सुधारण्याचे आश्वासन दिले होते, पण आता तेच शेतकऱ्यांना फुस लावत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चर्चेचे दार खुले ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवे शेतकरी कायदे रद्द करण्याचा हट्ट सोडावा,” असे आवाहन आठवले यांनी यावेळी केला.
एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरी थांबावे, असे आवाहन करुन ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार येऊन एक वर्ष झाले तरी भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत.