औपचारीक शिक्षणाला कौशल्यांची जोड हवी:बागुल
कुशल व्यवसाय प्रशिक्षणाचा
राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये शुभारंभ
पुणे :
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ शाळेत प्रवेश घेऊन औपचारिक शिक्षण देणे पुरेसे नाही; तर त्याला व्यावसायिक आणि जगण्याच्या कौशल्यांची जोड देणे आवश्यक आहे; याची जाणीव पालकांनी ठेवणे आवश्यक आहे; असे मत मा. उपमहापौर आबा बागुल यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या वतीने शालेय शिक्षणाबरोबरच कुशल व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्वयंसहाय्यता’ उपक्रमाचा शुभारंभ प्राजक्ता कोळपकर यांच्या हस्ते राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल, शिवदर्शन येथे करण्यात आला. यावेळी पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल,मृदुला शिंदे , , मानसी आडकर , श्रद्धा भगत , सुभाष औरादकर , अश्विनी शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
अनंत अडचणी आणि समाजाकडून दुस्वास सहन करून स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी हा उपक्रम सुरु होत आहे, याचा आनंद आहे. सावित्रीबाईंनी त्यांच्या काळात स्त्रीशिक्षणाचे एक धाडसी पाऊल उचलले होते. त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही हा नवा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राबविण्याचे धाडस केले आहे; असे मा. उपमहापौर बागुल यांनी यावेळी सांगितले.
घरात शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. शिक्षणाला पोषक वातावरण नाही. अशा पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. विशेषतः: महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतेक विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांमधील असतात. त्यांना भविष्यात कोणते शिक्षण घ्यावे याचे मार्गदर्शन मिळत नाही. तसेच अनेकांना लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाला हातभार लावणे गरजेचे असते.मात्र त्यांना शालेय शिक्षण घेताना पुढील करिअर काय; यावर कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी दहावी -बारावीनंतर या मुलांचे भवितव्य अधांतरी बनते आणि त्यांचे आयुष्य दिशाहीन बनते. त्यामुळे या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळावा; याबरोबरच त्यांना स्वावलंबनासाठी, अर्थार्जनासाठी शाळेतच मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा आधार लाभावा या उद्देशाने ही योजना राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘स्वयंसहाय्यता’ उपक्रम राबविण्यात येईल; असे बागुल यांनी सांगितले.
शालेय शिक्षणाबरोबरच कुशल व्यवसाय प्रशिक्षणाचा समावेश असलेला ‘स्वयंसहाय्यता’ हा उपक्रम दररोज शाळा सुटल्यानंतर दीड तास शाळेच्या वर्गखोल्यांमध्येच होणार आहे. दुपारी 3.30 ते 5 अशी वेळ या प्रशिक्षणाची असणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कुशल व्यवसायाची पायाभूत माहिती आणि त्याचे प्रात्याक्षिकांसह ज्ञान या प्रशिक्षणाद्वारे मिळणार आहे. शिवाय त्यांना पदविका प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसाय करता तर येईल. महिन्याला किमान 40 ते 50 हजार रुपये तो विद्यार्थी कमवू शकेल. त्याहीपेक्षा सद्यस्थितीत विविध कारणांमुळे इयत्ता 8 वी ते 10 वीच्या वर्गांमध्ये घटणारी पटसंख्या रोखण्यासाठी हा उपक्रम हा आधारवड ठरणार आहे. हा उपक्रम सुरु करण्याआधी समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली त्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांचे समुपदेशन केले आणि त्यानुसार पालकांच्या सहमतीने हा उपक्रम सुरु करीत आहोत, असे आबा बागुल यांनी स्पष्ट केले.
‘स्वयंसहाय्यता’ उपक्रमांतर्गत इंटिरिअर डिझायनिंग, टुरिझम , इलेट्रीकल इंजिनीअरिंग , बिझनेस मॅनेजमेंट , संगणक, कुटिरोद्योग व लघु उद्योग प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग, हॉटेल व्यवस्थापन, , ब्युटीपार्लर, लँड स्केपिंग, व्यवसाय व्यवस्थापन, स्किल्ड फोटोग्राफी , संगीतशास्त्र, अभिनय , मेकॅनिकल इंजिनीअरिंग अशा विविध विषयांचे कौशल्याधारित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचा लाभ या विषयातील प्रगत शिक्षणासाठी पूर्वतयारीच्या दृष्टीने होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पूर्ण होताच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची आवश्यकता आहे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील; अशी माहितीही बागुल यांनी दिली. घनःश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या चारुशीला मंत्री यांनी आभार मानले.
चौकट
आबा, हे विद्यार्थ्यांचे सांताक्लॉज !
नाताळच्या सणाला येणारा सांताक्लॉज मुलांच्या नकळत मुलांना आवडणाऱ्या, आवश्यक असणाऱ्या वस्तू भेट म्हणून ठेऊन जातो. त्याचप्रमाणे आबा बागुल यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा दूरगामी विचार करून त्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची अनमोल भेट प्रदान केली आहे; असे उदगार प्राजक्ता कोळपकर यांनी या कार्यक्रमात बोलताना काढले.