पुणे- एकीकडे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना , खुद्द बाळासाहेब शिवसैनिकांना सांगून गेले , उद्धवला तुमच्या हाथी सुपूर्त करतो आहे , त्याला सांभाळून घ्या … आणि आता आम्ही बाळासाहेबांच्याच मार्गावर त्यांचेच शिवसैनिक असे सांगत आता बंडखोरच बनलेले नाहीत तर उद्धवलाच बाजूला सारून शिवसेनाच काबीज करण्याची रणनीती हाताळू लागल्याने …आपल्याच सैनिकातून बाळासाहेबांच्या पुत्रावर वारावर वार होऊ लागल्याने निव्वळ शिवसैनिकच नाही तर नागरिकांत देखील उद्धव आणि ठाकरे कुटुंबाबद्दलचे प्रेम उफाळून येत असताना आता समाजवादी म्हणणारे, धर्मनिरपेक्ष म्हणणारे ,आणि कडवे मुस्लीम नेते सुद्धा या बंडाला ‘अयोग्य दिशेचे राजकारण ‘ठरवू लागले आहेत .
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी या सार्या बातम्यांवर नजर ठेऊन वेळोवेळी प्रतिक्रिया देत आहेत , काल रात्री जेव्हा उद्धव ठाकरेंनी वर्ष बंगला सोडला तेव्हा रस्त्यावर जो जनसागर लोटला आणि उद्धव आणि ठाकरे कुटुंबाप्रती त्यांनी जे प्रेम व्यक्त केले त्यानेच आमदार सारे एका बाजूला आणि जनता सारी दुसऱ्या बाजूला असल्याचे दर्शविले आहे मात्र यातही काही भाजपच्या लोकांनी उद्धव ठाकरेंनी कोरोन झालेला असताना ते लोकात मिसळले म्हणून पोलिसात तक्रार दिल्याची बातमी कालच झळकत होती यावर विश्वंभर चौधरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पहा ….
मी उदारमतवादी भारतीय आहे, खूनशी संघी नाही.
तुम्ही भारतीय आहात की संघी हे पुढच्या दोन दिवसात फेसबुकवर दिसणार आहे. एखादा मनुष्य जबाबदारीतून मुक्त झाला की त्याला farewell देण्याची अर्थात भावूक निरोप देण्याची परंपरा आहे. तर त्या व्यक्तीला त्या दिवशीही खुन्नस देणे ही संघीय परंपरा आहे. आज उद्धव ठाकरे कोरोना असूनही लोकांत मिसळले म्हणून भाजपानं पोलिसांमध्ये तक्रार केलीय असं वाचलं. हा आहे संघीय पद्धतीचा खूनशी send off. उद्धव ठाकरे आणि मविआवर टीका करणाऱ्या माझ्या अनेक पोस्ट्स फेसबुकवर आहेत. टीका करणे हा माझा हक्क आहे. पण दीर्घद्वेष ही माझी संस्कृती नाही. कारण मी उदारमतवादी भारतीय आहे, खूनशी संघी नाही.
खरा शिवसैनिक रस्त्यावर येऊन रडत आहे. ही कमाई किती जणांच्या नशिबात आहे?
विश्वंभर चौधरी यांनी अशी हि प्रतिक्रिया दिली आहे ….. उद्धव ठाकरे एका बिनभरवश्याच्या आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यात आले आणि आज एक सहृदयी माणूस, सरळमार्गी आणि निष्कपटी माणूस, आपल्या घरातला एक माणूस म्हणून बाहेर पडले. खरा शिवसैनिक रस्त्यावर येऊन रडत आहे. ही कमाई किती जणांच्या नशिबात आहे? शिवसेना संपली म्हणणारे लोक घाई करत आहेत. पुन्हा एकदा शिवसेना जोमानं उभी राहील. उद्धवजी, आदित्य, मिलिंद नार्वेकर आणि तमाम शिवसैनिक यांना नवी भरारी घेण्यासाठी शुभेच्छा.
ठाकरेंनी जनमानसाला जिंकले- संजय सोनवणी
प्रसिद्ध लेखक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनीही या राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे ,पहा त्यांनी काय म्हटले आहे ….
देशातील राजकीय संस्कृती बीभत्स रूप घेत असतांना सेनाप्रमुख मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे सुसंस्कृत आणि शालीन भूमिका घेत आपल्या मुद्द्यावर ठाम राहतात ही एक आश्वासक गोष्ट आहे. सेनेच्या राडा संस्कृतीला वेगळे वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्यच होता आणि आहे. आताच्या या राजकीय घडामोडी कोणती दिशा घेतील हे अनिश्चित असले तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी ही घडामोड अशोभनीय आणि निन्दनीय आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजहिताचा बळी देऊन सत्तेसाठी कोणतेही टोक गाठू शकणारे नरपुंगव येथे असावेत ही वेदनादायक बाब आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचे संयमी वर्तन दिलासादायक आहे. ते पदावर असतील किंवा नसतील, सेना त्यांच्या अखत्यारीत असेल किंवा नसेल पण त्यांनी जनमानसाला जिंकले आहे हे निश्चित.