पुणे: रिमोटद्वारे वीजचोरी करण्याचा चौथा प्रकार महावितरणने भोसरी एमआयडीसीमधील ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीच्या कारखान्यात उघडकीस आणला आहे. या कारखान्याच्या जागेत वीज वापर करणार्या लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीत 1,19,853 युनिटची म्हणजे 15 लाख 68 हजार 600 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत भोसरी एमआयडीसीमधील एफ टू ब्लॉक, प्लॉट क्र. 17/3 येथे ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आली आहे. या कारखान्याच्या जागेत लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचा वीजवापर सुरु आहे. महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या कारखान्यातील वीजवापराबाबत केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाला. त्यामुळे या कारखान्यातील वीजमीटर यंत्रणेची पाहणी केली असता रेझीन कास्ट मोल्डेड सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) ही यंत्रणा वीजचोरीच्या हेतूने हाताळल्याचे दिसून आले. अधिक तपासणीसाठी ही सीटी फोडण्यात आली व त्यात वीजचोरीसाठी हेतूपुरस्सर फेरफार करून रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत होती. या कारखान्यात 1 लाख 19 हजार 853 युनिटची म्हणजे 15 लाख 68 हजार 600 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
रिमोटद्वारे होणार्या वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, श्री. प्रवीण नाईक, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. रवींद्ग कंदारकर, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. एस. हातोळकर, सहाय्यक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भूजबळ योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीचे अमरजीतसिंग अरोरा, वीजवापरकर्ता लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचे भागीदार कमलाकर चिंतामण गोगटे, दत्तात्रय रघुनाथ इनामदार, पुजा प्रदीप नागवेकर, सोमनाथ रामदास यादव, अंगित सुरेंद्गन नायर या सहा जणांविरुद्ध शुक्रवारी (दि. 27) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
फोटो नेम व ओळ – MSEDCL Bhosari Theft 30112015 / वीजचोरीसाठी मीटरच्या यंत्रणेत बसविलेल्या रिमोट कंट्रोल सर्कीटची पाहणी करताना अधीक्षक अभियंता (चाचणी व गुणवत्ता) श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर व सहकारी.
—————————————
मुळशी, मंचर, राजगुरुनगरमध्ये
महावितरणचा त्रिसुत्री कार्यक्रम
दि. 3 डिसेंबरला 12 ग्रामपंचायतीमध्ये आयोजन
पुणे, दि. 30 : महावितरणच्या पुणे परिमंडलातील मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागात त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विभागातील 12 ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) या कार्यक्रमांतर्गत मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजदेयकांची व यंत्रणेची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.
याआधी मागील आठवड्यात गुरुवारी मंचर विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकाच दिवशी विविध प्रकारचे तब्बल 638 कामे पूर्णत्वास गेली होती. त्यानंतर आता मंचरसह मुळशी व राजगुरुनगर विभागातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री कार्यक्रम होणार आहे.
येत्या गुरुवारी, दि. 3 डिसेंबरला मंचर विभागातील (कंसात उपविभाग) खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) आणि बल्लाळवाडी (आळेफाटा), मुळशी विभागातील लोणीकंद (हडपसर ग्रामीण), थेऊर (उरळीकांचन), खानापूर (मुळशी), कापुर ओहोळ व केतकावळे (नसरापूर), राजगुरुनगर विभागातील वाडा (राजगुरुनगर) व सदुंबरे (तळेगाव) या 12 ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विद्युत ग्रामस्वच्छ अभियान, वीज देयक दुरुस्ती व महावितरण आपल्या दारी हे तीन उपक्रम एकाच दिवशी या त्रिसुत्री कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. विद्युत ग्रामस्वच्छ अभियानात झुकलेले वीजखांब सरळ करणे, लोंबकळणार्या तारांची, रोहित्र बॉक्सची दुरुस्ती आदी काम होतील. वीजबिल दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रिंडींग होत नसल्यास ते घेणे व वीज देयक दुरुस्त करून देणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे, ग्राहकांना वीज देयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. संबंधीत ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
————————————
बुधवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन
पुणे, दि. 30 : पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. 2 डिसेंबर) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.