सातारा- नुकतंच राष्ट्रवादीमधून भाजपवासी झालेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यात बैठक पार पडली. भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच दोन्ही राजांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर दोघा नेत्यांची भेट झाली.
या बैठकीनंतर शिवेंद्रराजेंनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, “महाराजांचा निरोप आल्यानंतर भेटायला गेलो होतो.” दोन्ही राजेंमध्ये औपचारिक चर्चा झाल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षवाढीसाठी याबाबत निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरणात बदल होत असल्याचेही शिवेंद्रराजे म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासात माझ्या मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. 370 सारखे कलम रद्द करत त्यांनी अखंड राखण्याचा प्रयत्न केला,” असे सांगत शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपचे कौतुक केले. तसेच “मी लोकसभेसाठी इच्छुक नसून मला राज्यात काम करायचे आहे,” अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
“कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात. मी कोणाचं सांगून काहीतरी करत नाही. मी दुसरं कोणाच्या सांगण्यावरून काही करत नाही. आम्ही दोघेही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहोत.” असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले. तसेच “उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल, पण जनतेचा आणि माझा, मी केलेल्या कामावर विश्वास आहे. त्यामुळे मतदार पुन्हा एकदा संधी देतील”, असा विश्वासही शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला.