मुंबई-पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी असमर्थता दर्शवली असून पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली, तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्या प्रतीप्रश्नावर अजित पवार यांनी या बैठकीत सूचक मौन बाळगले असल्याचे समजते. दरम्यान मावळ मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजप – सेना युती झाल्यास लक्ष्मण जगताप भाजपला सोडचिट्ठी देतील अशी शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांचा सुरु झालेला प्रवास राष्ट्रवादी ते शेकाप असा होऊन पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष प्रवेशापर्यंत पोहोचला हा प्रवास आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्ण गोलाकार होऊन पुन्हा राष्ट्रवादी पक्षाकडे चक्राकार पद्धतीने सुरु राहणार की काय अशी चर्चा सुरु आहे. अशी राजकीय उलथापालथ झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण ढवळून निघेल. मावळ लोकसभा मतदार संघाचा पवार यांनी आढावा घेतला. मतदार संघात पक्षाची बांधणीची माहिती घेतली. कोण कोण इच्छुक आहे याची माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपण मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. संजोग वाघेरे यांनी मतदार संघातील राजकीय परिस्थितीची माहिती शरद पवार यांना दिली. शरद पवार यांनी यावेळी मावळातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम करा, अशा सूचना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत दोन दिवस बैठक होत आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघांवर दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशा प्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातली एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्टावादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. 2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे मागितलेल्या आहेत. तर राजू शेट्टी यांना आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागा देण्यास राष्ट्रवादी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून परभणी आणि अमरावती या जागा बदली करून हव्या आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लढलेल्या जागा पुढीलप्रमाणे आहेत जळगाव, रावेर, बुलढाणा, अमरावती, भंडारा, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, रायगडमावळ, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा,सातारा,कोल्हापूर अशा आहेत याशिवाय मुंबईतही राष्ट्रवादीला एक जागा वाढवून हवी आहे. मुंबईतील मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे जिथून गुरुदास कामत यांनी निवडणूक लढवली ती जागा किंवा प्रिया दत्त लढवत असलेली मुंबई उत्तर मध्यची जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या व्यतिरिक्त काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत त्यामध्ये ईशान्य मुंबई -संजय दिना-पाटील, ठाणे -संजीव नाईक, रायगड-सुनील तटकरे, बारामती – सुप्रिया सुळे, कोल्हापूर – धनंजय महाडिक, भंडारा-गोंदिया – प्रफुल्ल पटेल, नाशिक – छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ, दिंडोरी – डॉ. भारती पवार, जळगाव – मनिष जैन, माढा – विजयसिंह मोहिते-पाटील, उस्मानाबाद – पद्मसिंह पाटील या नावांचा समावेश असून यांची नावं निश्चित झाल्याचे समजते आहे.