टी.व्ही. रामनमूर्थी, महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र
बँकेचे ग्राहकांबरोबरील संवादाचे स्वरूप डिजिटल तंत्रज्ञानामुळे बदलून गेले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये बँकसेवा क्षेत्रांमध्ये अमूलाग्र बदल झाला असून डिजिटल स्वीकृतीमुळे भारतातील व्यवसाय करण्याच्या पद्धतीचा मार्गच बदलला आहे. ऑनलाइन देयके देणे, मोबाइल बँक सेवा आणि सोशल अॅप्लिकेशन बँकसेवा या नव्या मार्गाचा अवलंब व्यवसायक्षेत्रात झाला आहे. चलन निश्चलीकरणाच्या निर्णयाला आता वर्षपूर्ती झाली आणि या निर्णयापासूनच डिजिटल व्यवहारांना यापूर्वी कधीही लाभली नाही अशी गती लाभली आहे. भारतात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झालेले डिजिटल व्यवहार 2017-18 सालामध्ये 25 अब्ज इतक्या व्यवहारांच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
सीआयआय अहवालानुसार, भारतातील बँक क्षेत्र सध्या 81 ट्रिलियन रुपये इतक्या मूल्यप्रमाणात आहे आणि 2020 सालापर्यंत जगातील पाचव्या क्रमांकावर सर्वात मोठे क्षेत्र बनेल, अशी अपेक्षा आहे. भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे वित्तीय साक्षरता वाढण्यास मदत झाली आहे. यामुळेच गेल्या दशकभरात बँक क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे वित्तीय यंत्रणेतील लोकांचा सहभाग स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमत:च इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिजिटल देयके देण्याच्या पायाभूत सुविधांमुळे तब्बल 35 कोटींपेक्षा जास्त आधार कार्डाशी संलग्नित खात्यांमध्ये वार्षिक अनुदान थेट हस्तांतरीत करणे किंवा इतर निधी जमा करणे शक्य झाले आहे – ज्याचा लाभ JAM (जन-धन आधार मोबाइल) घेत आहेत.
क्रेडिट आणि डेबिट कार्डांच्या साहाय्याने दिली जाणारी डिजिटल देयके किंवा इतर व्यवहार; अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा (यूएसएसडी), मोबाइल फोन आणि अॅप्लिकेशन प्रोग्रॅम यांच्यातील दुहेरी संवाद; ई-वॉलेट्स; इंटरनेट किंवा ऑनलाइन बँक सेवा आणि भिम अॅप (भारत इंटरफेस फॉर मनी), युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) यासारखी प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) आदी व्यवहारांमार्फत दोन बँक खात्यांमध्ये मोबाइलच्या साहाय्याने तातडीने निधी हस्तांतरीत करता येतात.
परंतु नाण्याला दोन बाजू असतात :
एकीकडे अनेक लोक पारंपरिक बँक सेवांऐवजी डिजिटल बँक सेवांचा अंगिकार करत आहेत, याच तर दुसरीकडे दिवसेंदिवस गोपनीय माहिती चोरणे, सायबर हल्ले आणि सुरक्षिततेचा भंग असे धोकेही निर्माण होत आहेत. आपली प्रत्यक्ष मालमत्ता सुरक्षित ठेवण्याबरोबरच, डिजिटल संपत्तीही सुरक्षित ठेवणे हे आजच्या आधुनिक काळाची गरज बनली आहे.
जवळपास प्रत्येक दिवशी रँनसमवेअरची एखादी घटना तरी घडतेच – यासारख्या धोकादायक सॉफ्टवेअरमुळे वैयक्तिक गोपनीय माहिती चोरली जाते शिवाय रँनसममध्ये पैसे दिल्याशिवाय आपलीच खाती वापरता येत नाहीत किंवा एखादा फोन किंवा एसएमएस आल्याबरोबर व्यक्तीच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम तातडीने गायब होते.
सायबर हल्ल्यांविरोधात लढण्यासाठी जी काही काळजी घेणे आवश्यक आहे, ती बँका आणि फिनटेक्स घेतच आहेत, परंतु प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी टाळाव्यात हेही जाणून घेतले पाहिजे.
व्यवहारांचा हा नवा मार्ग स्वीकारताना प्रत्येकाने पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत :
पासवर्ड
- तुमच्या खात्याची माहिती कधीही सेव्ह करू नका, यात खाते क्रमांक, क्रेडिट आणि डेबिट कार्डांचे पिन क्रमांक कधीही मोबाइल, लॅपटॉप किंवा आय-पॅडवर अथवा कार्डाच्या क्व्हरवर सेव्ह करू नका.
- अनधिकृत वापर टाळण्यासाठी तुमचा फोन नेहमी लॉक असू द्या.
- तुमचा पासवर्ड सहज ओळखता येणार नाही असा असावा, यात मुळाक्षरे आणि क्रमांक यांचे समीकरण हवे आणि विविध खात्यांना विविध पासवर्ड वापरा. ते लिहून ठेवू नका.
- तुमच्या ब्राउजरमधून `ऑटो कम्प्लिट’ प्रक्रिया काढून टाका.
- तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलसाठी नेहमी पॉवर ऑन / अॅक्सेस पासवर्ड वापरा तसेच स्क्रीनसेव्हर पासवर्ड वापरा, यामुळे तुमची यंत्रणा तुमच्या परवानगी शिवाय कुणीही वापरू शकणार नाही.
सुरक्षितता
- मोबाईल बँकिंग अॅप नियमितपणे नवे व्हर्जन आल्यास / अपग्रेड झाल्यास अपडेट करा. नेहमी अधिकृत अॅप्लिकेशन वापरा, कधीही रन-डाउन व्हर्जन वापरू नका.
- फायरवॉल आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि तो नेहमी अपटेड करत राहा, यामुळे धोकादायक सॉफ्टवेअर डिलिट करणे किंवा नाहीसे करण्यासाठी मदत होते. सुरक्षिततेचा प्रोग्रॅम किंवा अँटीव्हायरस नियमितपणे अपटेड करत राहा.
- आपल्या खात्यावरून नेहमी लॉग ऑफ करा आणि काम पूर्ण झाल्यावर ब्राउजर बंद करा.
- व्यववहारांचे एसएमएस आणि ईमेल आणि ओटीपी नेहमी तपासत राहा आणि तुम्ही न केलेल्या व्यवहाराचे अलर्ट आल्यास बँकेला तातडीने कळवा.
अनोळखी ठिकाणाहून आलेली लिंक टाळा (थर्ड पार्टी लिंक)
- इतरांचे कॉम्प्युटरवर आणि रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि सायबर कॅफे अशा सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट बँकिंग वापरणे टाळा.
- अनोळखी ठिकाणाहून (थर्ड पार्टी) आलेली लिंक किंवा ईमेल उघडणे टाळा.
- अनोळखी स्रोतांकडून आलेली अॅप कधीही डाउनलोड करू नका.
- टेलिमेकर्स किंवा कॉलर्सना आपल्या खात्याची कुठलीही माहिती देऊ नका, अगदी त्यांनी तुमच्या खात्याची पडताळणी करायची आहे असे सांगितले तरीही.
तुमच्या बँकेशी वेळोवेळी संपर्कात राहा
- तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचा संशय आल्यास बँकेला तातडीने माहिती द्या किंवा किमान कामाच्या तीन दिवसांमध्ये तरी कळवाच, ज्यामुळे तुमच्या तक्रारीची योग्य नोंद घेतली जाईल.
- तुमच्या मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी किंवा पत्ता यामध्ये काही बदल झाल्यास तातडीने बँकेला कळवा.
- डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास बँकेला तातडीने माहिती द्या किंवा तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होऊ नयेत म्हणून ते हॉटलिस्ट करून घ्या.
- तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास बँकेला ताबडतोब कळवा.
नियमित तपासणी
- आपल्या खात्यातील बाकीवर आणि भूतकाळात केलेल्या व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवा.
आताच्या आधुनिक युगात जुन्या पद्धतीच्या बँक व्यवहारांचे दिवस संपलेत. बँक क्षेत्र जितक्या जास्त प्रमाणात डिजिटल तंत्राने पुढे जाईल, आपली अत्याधुनिक उत्पादने ग्राहकांना 24×7 तांत्रिकदृष्ट्या पुरवेल आणि विविध श्रेणीतील सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देईल, तितक्याच वाढत्या प्रमाणात डिजिटल आणि नेट बँकिंग फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
भारत सध्या रोकड-रहित अर्थयंत्रणेकडे वाटचाल करत आहे, यामध्ये ग्राहकांनी वैयक्तिक पातळीवर आपल्या देयकांच्या यंत्रणांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे – यामुळे डिजिटल बँक सेवांचा अधिक चांगल्या प्रकारे आणि सुलभतेने आनंद घेता येणार आहे.