पुणे-मागासवर्गीयांवर अन्याय होताना गप्प बसायचे आणि न्याय मागायला लोकशाही मार्गाने आंदोलने करू पाहणाऱ्यांना वेगळ्या वळणावर न्यायचे असे पाप प्रशासनाने करू नये असा सज्जड इशारा माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष मातंग समाजाचे नेते रमेश बागवे यांनी येथे दिला. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने धरणे आंदोलन बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांना स्पीकर वरून बोलण्यास सुरुवातीला मज्जाव करण्यात आला . त्यानंतर बागवे येथे येताच त्यांच्या कानावर हि बाब कार्यकर्त्यांनी घातली तेव्हा बागवे यांनी संबधित अधिकाऱ्याला जाब विचारला .
यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले ,’लाखोंच्या संख्येने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देणे म्हणजे मागासवर्गीयांच्या विकासाची दारे बंद करून त्यांची अधोगती करण्यासारखे आहे हे खरंतर काही पक्ष व अधिकारी जे मनुविचारांनी कार्य करतात. ते पुन्हा मनु संस्कृती समाजामध्ये रुजू होण्याच्या दृष्टीने मागासवर्गीय आणि दलितांनी शिक्षण घेऊ नये, व्यवसाय करू नये त्यांनी अजूनही शोषितच् रहावे या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही मातंग समाज महासंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शांततेत मोर्चा काढून आमच्या मागण्या शासनाकडे दिल्या होत्या, परंतु सरकारने व शासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत जोपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही व इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे यावेळी रमेश बागवे यांनी म्हणाले .