पुणे – पुण्याचे नाव बदलून जिजामातेवर आधारित जिजापूर असे पुण्याचे नव्याने नामकरण करा अशी मागणी करणारे निवेदन
आज उपजिल्हा अधीकारी जयश्री कटारे यांना संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाच्या वतीनेदेण्यात आले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आणि फैजाबाद या शहराची नावे बदलून अनुक्रमे प्रयागराज आणि अयोध्या अशी ठेवली आहेत. यानंतर देशातील विविध शहरांची नावे बदलण्याचा जणू ट्रेंड सुरु झाला आहे. अहमदाबाद, हैद्राबाद, आग्रा यासह औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. असे असतानाच पुणे शहराचेही नाव बदलून जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. यावर शहरातील तज्ज्ञांनी तसेच नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी पुणे शहराला जिजाऊंचा वसा व वारसा आहे. हे शहर राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सर्व खजिना खाली करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर ठेवावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर पुणे शहराविषयी अस्था असणारे, इतिहास संशोधक आणि नारिकांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.