पुणे-‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ तर्फे महाकवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी ‘माध्यम
रत्न’पुरस्कार दिले जाणार आहेत. यंदा चैत्राली चांदोरकर (महाराष्ट्र टाईम्स ), हलिमाबी अब्दुल कुरेशी
(बी.बी.सी.वर्ल्ड न्यूज – मराठी) आणि दीपा भंडारे (आकाशवाणी) यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
बुधवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘पत्रकार भवन’नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
५००० रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच ‘नाद-संवाद’या प्रामुख्याने
कलावंताच्या छोट्या मुलाखतींवर आधारित तन्मयी मेहेंदळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही संपन्न होईल, अशी
माहिती ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी दिली.
मराठी पत्रकारिता अथवा मराठी साहित्य यामध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तीस प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी
‘माध्यम रत्न’अथवा ‘;मराठी रत्न’ पुरस्कार देऊन गौरविले जाते. यापूर्वी सुधीर गाडगीळ, प्रल्हाद सावंत, सतीश
कामत, डॉ. शैलेश गुजर, सुलभा तेरणीकर, अरविंद गोखले, मुकुंद संगोराम, प्रभाकर खोले, सुजाता देशमुख, मधू
पोतदार, देविदास देशपांडे, चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर, श्रीधर लोणी, अशांना ‘माध्यम रत्न’अथवा ‘मराठी
रत्न’पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे.
चैत्राली चांदोरकर – या पुण्यात दै. महाराष्ट्र टाईम्स मध्ये गेली ८ वर्षे वरिष्ठ वार्ताहर म्हणून काम करीत आहेत.
पर्यावरण, हवामान बदल, तसेच महिला व बालकल्याण या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. यापूर्वी बेळगाव
तरुण भारतची पुणे प्रतिनिधी व दै. सकाळ मध्ये वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. ‘युरोपिअन कमिशन’तर्फे महिला
पत्रकारांसाठी आयोजित ‘वूमन इन मिडिया’ या प्रकल्पात सहभाग व त्यासाठी युरोपचा अभ्यास दौरा. तसेच पॅरीस
येथे २०१५ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामानबदल परिषदेमध्ये सहभाग. पॅरीस कराराचे प्रत्यक्ष
जाऊन वार्तांकन करणारी पुण्यातील एकमेव महिला पत्रकार. पाठोपाठ अमेरिका पॅरीस करारातून बाहेर पडल्यावर
जर्मनीमध्ये बर्न येथील ‘जागतिक हवामान बदल’ परिषदेतही उपस्थित राहून वार्तांकन.’;इको जर्नालिस्ट’
पुरस्काराने सन्मानित.
हलिमाबी अब्दुल कुरेशी – या बी.बी.सी. वर्ल्ड न्यूज – मराठी विभागात पश्चिम महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून
काम करीत आहेत. यापूर्वी सुमारे ६ वर्षे त्यांनी न्यूज १८ लोकमत चॅनेलमध्ये वरिष्ठ पुणे प्रतिनिधी म्हणून काम केले.
मानवी सफाई कामगारांवरील वृत्तांत, बीफ बंदीवरील महाराष्ट्रातील परिणाम, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील
दुष्काळग्रस्त भागांवरील वृत्तांत, एम.आय.टी. रॅगिंग प्रकरण, माळीण दुर्घटना, मुस्लीम जातपंचायत वरील वृत्तांत,
ट्रिपल तलाक व हलाला वरील वृत्तांत, पंढरपूरवारी वृत्तांत असे त्यांचे अनेक वृत्तांत गाजले’रामनाथ गोयंका
एक्सलन्स अवॉर्ड इन जर्नेलीझम’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना
मिळाला.
दीपा भंडारे – या गेली सुमारे २० वर्षे पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करीत असून कीर्तन,
शास्त्रीय गायन आणि तबला वादन यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. सवाईगंधर्वसह शेकडो सांस्कृतिक
कार्यक्रमांचे रसग्रहण व वार्तांकन त्यांनी विविध मराठी वृतपत्रांमध्ये केले आहे. शेकडो कलाकारांच्या मुलाखती
त्यांनी वृत्तपत्रासाठी घेतल्या असून कीर्तन आणि अध्यात्म यावर विपुल लेखन केले आहे. मराठवाडा मित्रमंडळाच्या
वाणिज्य महाविद्यालयात पत्रकारिता विभागात गेली ८ वर्षे त्या शिकवत आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना
सन्मानित केले गेले आहे.
‘नाद-संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार असून गेल्या अनेक वर्षांमध्ये तन्मयी मेहेंदळे यांनी
घेतलेल्या निवडक कलावंतांच्या मुलाखतींवर आधारित हे पुस्तक आहे. यातील अनेक मुलाखती यापूर्वी दै. सकाळ,
दै. प्रभात व दै. सामना मध्ये प्रकाशित झालेल्या असून त्याचे संकलन या पुस्तकात आहे. ज्येष्ठ निवेदक व
मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे.