पुणे : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या एक दिवसीय त्रिसुत्री मोहिममध्ये पुणे ग्रामीण मंडलातील लोणावळा शहरासह 11 गावांमध्ये 553 विविध कामे करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत एकदिवसीय त्रिसुत्री उपक्रम सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत कळंब, नांदुर, टाकेवाडी, साकोरे (घोडेगाव उपविभाग), अवसरी बुद्गुक, अवसरी खुर्द व लगतच्या दोन वाड्या (मंचर उपविभाग), कुंजीरवाडी व उरळी कांचन (उरळी कांचन उपविभाग), रामनगर, भूशी, खोंडकेवाडी व लोणावळा शहर परिसर (लोणावळा उपविभाग), कुरकुंडी (राजगुरुनगर उपविभाग), आपटाळे (जुन्नर उपविभाग) या गावांमध्ये वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे एकूण 445 कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे क्लिनिंग व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे, फिडर पिलरला झाकणे लावणे आदी कामांचा समावेश आहे.
याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे अशा प्रकारची 57 कामे करण्यात आली तर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर 51 ग्राहकांना जागेवरच नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यासोबत गावकऱ्याांशी संवाद साधून त्यांना विविध योजनांसह महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा, मोबाईल अॅप आदींची माहिती देण्यात आली व वीजसुरक्षेबाबत प्रबोधनही करण्यात आले.
एक दिवसीय त्रिसुत्री उपक्रमाची पूर्वमाहिती दिल्यानंतर संबंधीत गावात महावितरणचे अभियंता व जनमित्र तसेच बिलिंग स्टॉफ एकाच दिवशी ग्राहकसेवेचे काम करीत आहेत. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या आनंदाने महावितरणला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंदेले (मुळशी), किशोर गोरडे (राजगुरुनगर), प्रकाश खांडेकर (मंचर), अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. उमेश चव्हाण (लोणावळा) तसेच उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे (घोडेगाव), संतोष तळपे (मंचर), प्रदीप सुरवसे (उरळी कांचन) मनीष कडू (राजगुरुनगर), जयंत गेटमे (जुन्नर), सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह जनमित्र या उपक्रमात सहभागी झाले.