ब्राह्मण समाजाने उद्योजकता विकासावर भर द्यावा- कलराज मिश्र
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “ब्राह्मण समाजाकडे ज्ञान आहे. जिद्द, चिकाटी यासारखे गुण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया यासारखे महत्वाकांक्षी उपक्रम राबविले आहेत. त्याचा लाभ घेत ब्राह्मण समाजाने उद्योजकता विकासावर भर द्यायला हवा. त्यासाठी समाजातील इतर उद्योजकांनी तरुणांना उद्योग क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असा सल्ला माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार कलराज मिश्र यांनी दिला.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात ब्राह्मण उद्योजकांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कलराज मिश्र बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, परिषदेचे स्वागताध्यक्ष अमर साबळे, तेलंगणातील खासदार वेणुगोपाल आचार्य, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, चितळे दूधचे नानासाहेब चितळे, बडवे इंजिनीअरिंगचे नानासाहेब बडवे, व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, आर. जी. शेंडे, विवेक कोल्हटकर, संदीप खर्डेकर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, शहराध्यक्ष मयूर अरगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कलराज मिश्र म्हणाले, “कृषी आणि उद्योग यावरच देशाचा विकासदर अधिक प्रमाणात अवलंबून असतो. छोटे छोटे उद्योग सुरु करून समाज सक्षम बनेल. तरुणांनी नोकऱ्या मागणारे बनू नये, तर नोकऱ्या देणारे बनावे. बेरोजगारीवर स्वयंरोजगारी हाच उपाय असून, ज्ञान-कौशल्ये आत्मसात करत उद्योग करण्याचा आपला प्रयत्न असावा. गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्ती आहे. इनोव्हेटिव्ह कल्पना लढवून त्याचे उद्योगात रूपांतर कसे करता येईल, याचा विचार करावा.”
अमर साबळे म्हणाले, “विकासाची गंगा तळातल्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समाजाचे एकत्रीकरण होणे गरजेचे आहे. संविधानावर विश्वास ठेवून काम करणारे सगळेच देशभक्त असून, महिलांचा, ज्येष्ठांचा सन्मान करण्याची परंपरा ब्राह्मण समाजाने जपली आहे. समाजाला संस्कारित करण्यासह रोजगारनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. अलीकडे ब्राह्मण समाजात उद्योजक वाढत आहेत, ही आनांदाची बाब आहे.”
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “आपल्या समाजाला आरक्षण नको, तर संरक्षण मिळायला हवे. त्यासाठी संघटित होऊन समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपण काम करणे गरजेचे आहे. व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारकडे आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती. परंतु, आपण आपल्या स्तरावर एकत्रित येऊन नवतरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहित करायला हवे.”
श्रीकांत बडवे म्हणाले, “तरुणांनी पाच ‘आय’चा मंत्र पाळावा. त्यामध्ये ‘इंट्रोस्पेक्ट’ अर्थात आपल्या क्षमता ओळखून उद्योगात उतरावे. त्यात सतत सुधारणेला (इम्प्रुव्हमेंट) वाव असावा. नवनिर्मितीच्या (इनोव्हेशन) ध्यासातून चांगले काम उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच केवळ विचार करून थांबता कामा नये, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी (इम्प्लिमेंट) होणे महत्वाचे असते. तसेच आपण करत असलेले काम समाजाला उपयुक्त (इंटिग्रेट) असावे.”
यावेळी ‘ब्रह्मोत्सव – २०१८’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. वेणुगोपाल आचार्य यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उदय महा यांनी प्रास्ताविक केले.