शाळांमध्ये संविधान उद्येशिका स्तंभ, बुध्दविहार, व्यायामशाळा, मंदिराची डागडुजी, वाचलनाय, पक्के रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, उद्यानाची निर्मिती, स्वच्छतागृह, पाण्याच्या टाक्यांची उभारणी अशा विविध विकासकामांचे उद्घाटन यावेळी झाले. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आठवले व महातेकर यांचा विशेष सत्कार प्रभागाच्या वतीने करण्यात आला.
गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे -रामदास आठवले
पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची शिकवण दिली. त्यांच्या आदर्शांवर काम करणारा आपला पक्ष आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, ही जाणीव ठेवून सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून ही तीन कोटींची विकासकामे झाली आहेत, याचा आनंद वाटतो. वंचितांच्या जीवनात आनंद भरण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्याला आपण नेहमी प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
औंध-बोपोडी प्रभागातील तीन कोटींच्या निधीतून केलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. माता रमाई आंबेडकर विद्यालयात झालेल्या या समारंभावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गिरीश बापट, आमदार विजय काळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अविनाश महातेकर म्हणाले, “अतिशय कल्पकतेने ही विकासकामे उभारली आहेत. राज्यघटनेचे पहिले पान शाळेत लागले हे महत्त्वाचे आहे. त्यातून लोकांना प्रेरणा मिळेल. माता रमाई आणि डॉ. आंबेडकर यांच्या शिल्पामुळे शाळेचा परिसर अधिकच शोभनीय झाला आहे. या चारही नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभागात केलेल्या कामांमुळे लोकांच्या जीवनात बदल घडतील. माझ्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी योग्यरितीने सांभाळून वंचित घटकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.”
गिरीश बापट म्हणाले, “सामान्य माणसाला जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण केले पाहिजे. त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्याला दैनंदिन जीवन सुखाचे जगण्याची संधी आपण द्यायला हवी. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभा असतो. गोरगरीब माणसांची सेवा हेच आंबेडकर यांना वंदन असून, त्यांच्याकडून प्रेरणा घेत कामी करत आहे. चांगल्या कामांसाठी पैसा कमी पडू देणार नाही. या प्रभागात उभारलेली कामे कौतुकास्पद आहेत.”
रामदास आठवले म्हणाले, “गरिबीत अहोरात्र काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आरोग्य, शिक्षण यासह मूलभूत सुविधा पुरवाव्यात. समाजाच्या हिताचे काम करण्यावर भर दिला पाहिजे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी चांगल्या गोष्टी उभारणे गरजेचे आहे. माझ्या मंत्रालयामार्फत अनेक चांगले कामे करणार आहे. लोकांनी चांगले प्रकल्प घेऊन यावे. त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देईन. महिलांनी बचत गट आणखी बळकट करावेत. गिरीश बापट यांचे काम खूप चांगले असून, त्यांना लवकरच केंद्रात मंत्रिपद मिळावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला धरून काम करीत आहेत. देशातील गरिबी निर्मूलन होण्यासाठी आम्ही सगळेच मेहनत घेत आहोत.”
परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश ढोरे यांनी आभार मानले.