पुणे : लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. त्यांचे आरोग्य सुदृढ राहिले पाहिजे, त्यासाठी सकस आहार व योग्य व्यायाम गरजेचा आहे. असे मत अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या “स्वास्थ भारत’ कार्यक्रमात ते बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुणे विभागीय आयुक्त सुरेश देशमुख, महापालिका आरोग्य अधिकारी अंजली साबणे, अन्न प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, पल्लवी भाईटे, वि.म. जावडेकर, संशोधक डॉ. नाईकनवरे, आहार तज्ञ अनुजा किणीकर, अन्न अमृत फौंडेशन इस्कॉनचे सुरेश भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अदिती कुलकर्णी यांनी केले.
बापट म्हणाले, देशातील अबाल वृद्ध सुदृढ राहावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ Eat Right India’ ही संकल्पना मांडली. भारतीय अन्न व मानके प्राधिकरणाने ही संकल्पना उचलून धरली. त्यातून एक लोकचळवळ उभी राहिली . ही चळवळ सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी “ स्वास्थ भारत यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब यासारख्या आजाराने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे लक्षात घेऊन बालकांना असे आजार होऊ नयेत अशी काळजी आपण घेतली पाहिजे. मुलांना सकस आहार दिला पाहिजे. त्यांना मैदानावर खेळू दिलं पाहिजे. .तेल, मीठ आणि साखर यांचे अतिसेवन आरोग्यास हानिकारक आहे.हे समजावून सांगण्यासाठी पालकांचे प्रबोधन व्हायला हवे. या यात्रेमधून असे प्रबोधन होणार आहे. अशा प्रयत्नातून नक्कीच भावी पिढी सदृढ होऊन नरेंद्र मोदींचे स्वस्थ भारत हे स्वप्न पूर्णत्वास जाईल.
महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंती तसेच जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने (१६ ऑक्टोबर ) देशातील ६ शहरांमधून या यात्रेला सुरुवात झाली. २७ जानेवारी पर्यंत ही यात्रा देशातील सर्व शहरात पोहोचणार आहे. पुणे शहरात गुरुवारी (दि. ६) ही यात्रा दाखल झाली. यानिमित्ताने आज शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यांत आले होते. यांनिमित्ताने सकाळी शनिवारवाड्यापासून काढलेल्या प्रभात फेरींध्ये सुमारे १००० शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. मुख्य कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.