पुणे-कॉँग्रेसची खरी ताकद सर्वसामान्य जनता आहे. कॉंग्रेस पक्ष हा गुणवत्तेवर चालतो आणि ती गुणवत्ताmम्हणजे घरेलू कामगार महिला आहे. राहुल गांधींनी तुमच्यासाठी महिना सहा हजार रुपये उत्पन्नाची हमीदेणारी ‘न्याय’ योजना जाहीर केली आहे. त्यामुळे ‘न्याय’ योजना अंमलात आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे सरकार येणे आवश्यक असून मोहन जोशी यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. मोदी फक्त घोषणा करतात आणि फसवतात त्याउलट राहुल गांधी घोषणा करतात आणि त्या पूर्णही करतात, असा टोला त्यांनी मोदींना लगावला.
कोंग्रेस-राष्ट्रवादी कोंग्रेस आणि मित्र पक्षांचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय मजदूर संघ आणि पुणे शहर असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने घरेलू कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, पुणे शहर असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष एस.के. पळसे, सीताराम चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. देशात आणि राज्यात कोंग्रेसचे सरकार आले तर युतीच्या सरकारने घरेलू कामगारांसाठी बंद केलेली पेन्शन योजना पुन्हा सुरू करू असे
आश्वासनही हर्षवर्धन पाटील यांनी घरेलू कामगार महिलांना दिले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यात कोंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना आम्ही घरेलू कामगारांसाठी पेन्शन योजना केली होती. दुर्दैवाने २०१४ ला आमचे सरकार गेले आणि भाजप सरकारने ही योजना बंद केली. तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे डब्यात, घरात ठेवता. मात्र, अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. कष्टाने मिळालेला आपलाच पैसा बँकेत भरण्यासाठी रांगा लागल्या.त्यात १०० पेक्षा जास्त जणांचे प्राण गेले. ज्यांच्याकडे काळा पैसा होता ते मात्र मागच्या दाराने येवून त्यांचे पैसे बँकेत भरले. आता मोदींना आणि भाजपला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
राहुल गांधींनी गरिबांसाठी न्याय योजना आणली आहे. सरासरी ५ माणसांचे कुटुंबाला वर्षाला ७२,०००/- रुपये पाच वर्षे मिळणार आहेत. राहुल गांधींनी छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये सरकार आल्यावर दहा दिवसात कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यावर दोन दिवसात त्याची अंमलबजावणी केली. नरेंद्र मोदींनी तुम्हाला २०१४ ला अनेक आश्वासने दिली होती त्यापैकि एकही आश्वसनाची पूर्तता त्यांनी केली नाही. मोदी फक्त घोषणा करतात आणि फसवतात त्याउलट राहुल गांधी घोषणा करतात आणि त्या पूर्णही करतात. २०१४ ला घरात जावून टीव्ही लावला की मोदींचा चेहरा दिसायचा आता ते दिसले की चॅनेल बदला म्हणतात. आता देशाची व राज्याची हवा बदलली आहे. मोदी सरकार आंधळे, बहिरे आणि बधिर सरकारआहे. हे सरकार बद्ल्ण्यासाठी मोहन जोशी यांच्या पाठीमागे उभे राहा. घरेलू कामगार महिलेने रोज शंभर घरांमध्ये जावून मोहन जोशी यांना निवडून आणण्याचे आवाहन करा असे त्यांनी संगितले. सोनल पटेल म्हणाल्या, ‘न्याय योजना’ ही कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मात्र, जेव्हा कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल तेव्हाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही योजना समजून घेवून दुसर्यालाही समजून सांगा. आत्तापर्यंतच्या योजना या सेवा आणि वस्तूंच्या स्वरुपात होत्या. त्याची मर्जी ही सरकारची असायची. मात्र, न्याय योजनेच्या माध्यमातून तुमच्या हातात ७२ हजार रुपये पडणार आहेत. ते तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे खर्च करू शकणार आहात असे त्यांनी सांगितले.
एस. के. पळसे यांनी प्रास्ताविक केले तर सीताराम चव्हाण यांनी आभार मानले.