पुणे-रंगत-संगत प्रतिष्ठान व श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य प्रतिभा हा पुरस्कार यंदा आषाढ़ काव्य संग्रहाच्या कवयित्री व प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नॅशनल शिपींग बोर्डचे चेअरमन प्रदीप रावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी माजी नाट्यसंमेलनाध्यक्षा किर्ती शिलेदार उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अॅड. प्रमोद आडकर व शामची आई फाउंडेशनचे भारत देसडला उपस्थित होते.
यावेळी भाग्यश्री देसाई त्याचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या; रंगत-संगत प्रतिष्ठानचा हा पुण्यातला माझा पहिला पुरस्कार आहे. याचा मला खूप आनंद होतोय. आता पर्यंत मला खूप पुरस्कार मिळाले पण हा पुरस्कार मला आंनद देणारा आहे. यावेळी त्यांनी काही निवडक कविता सादर केल्या. त्यापुढे म्हणाल्या की; आषाढ काव्यसंग्रह माझ्या ह्रदयाजवळचा आहे. नवीन लेखकांनी व कवींनी बिनधास्तपणे लेखन करून रसिकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. मात्र ते लेखन पाठवताना दर्जात्मक असावे असे त्या म्हणल्या.
कीर्ती शिलेदार म्हणाल्या की भाग्यश्री देसाईयांचे आणि माझे खूप वर्षापासून ऋणानुबंध आहेत. भाग्यश्री यांच्यावर घरातूनच चांगले संस्कार झाले असल्याने त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून आपल्याला ते दिसतात, म्हणून भाग्यश्री या खूप चांगली चित्रे काढतात. त्याचबरोबर कवियत्री, अभिनेत्री निर्माती असे त्याच्यात सद्गुण आहेत.
प्रदीप रावत म्हणाले कि भाग्यश्री देसाई यांचे आणि माझे कौटुंबिक नाते असून मी एक उत्तम वाचक आहे. कविता वाचन करताना माणसाचे मन तरूण ठेवण म्हत्वाच आहे. साहित्य क्षेत्रात प्रत्येक कवीच एक वेगळ अस्तित्व असलं पाहिजे. कारण मानवी मनाचं भावविश्व एकच आहे. मराठी साहित्य अजून समृद्ध होईल असे मला वाटते. भाग्यश्री यांच्या कविता मनाला व अंतर्मनाला भिडत असल्याने त्यांच्या कविता वेगळ्या उंचीवर घेवून जातात. या प्रसंगी रावत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. भारत देसडला यांनी आभार व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.