दोन समांतर रेषा कधीही जुळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत… पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. पराकोटीच्या तिरस्कारातूनसुद्धा सरतेशेवटी प्रेमाचा अंकुर फुटतो इतकी ताकद प्रेमात असते. ती व्यक्ती समोर आली की नकोशी वाटते पण नजरेआड होताच जीवाची घालमेल होते. सिद्धी आणि शिवाच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात,पण नियती आपला डाव खेळतेच. अशी परिस्थिती उदभवते की सिद्धी – शिवा यांना बेसावधपणे लग्नाच्या बंधनात अडकवलं जातं आणि मग कसोटी लागते प्रेमाची. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या या दोघांमध्ये प्रेम भावना निर्माण होईल का ?तिरस्काराच्या धगधगत्या निखाऱ्यावर शिवा आणि सिद्धीमध्ये प्रेम फुलू शकेल ? सिद्धी आणि शिवा ह्या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा “जीव झाला येडापिसा” १ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. मालिकेचे विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. नवोदित विदुला चौघुले सिद्धीची भूमिका आणि अशोक फळदेसाई शिवाची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, चिन्मयी सुमित देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.