झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ मध्ये हेगडी प्रधानांची भूमिका करणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे आकस्मिक निधन झाले आणि अवघ्या मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली. आपल्या आवडीच्या कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला. अशा दुःखद प्रसंगात सहकलाकार आणि संपूर्ण टीमचं सावरणं खूप अवघड असतं, पण प्रेक्षकांना दिलेलं मनोरंजनाचं वचन पाळणंही तेवढंच गरजेचं असतं. अशा स्थितीत “शो मस्ट गो ऑन” म्हणत काही गोष्टींची नव्याने जुळणी आणि सुरुवात करावीच लागते. हेगडी प्रधानांच्या भूमिकेबाबतही आता हेच घडणार असून ही लोकप्रिय भूमिका आता नकुल घाणेकर साकारणार आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडेरायांचे प्रधान असलेले हेगडी प्रधान हे विष्णूंचा अवतार होते. खंडेरायांच्या राज्यकारभारात आणि वैयक्तिक आय़ुष्यातही कायम साथ देणारी ही व्यक्तिरेखा त्यामुळे मालिकेतही त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची होती. मालिका सुरू झाल्यापासून अतुल अभ्यंकर हेगडी प्रधान साकारत होते. पण त्यांच्या अकाली निधनाने ही भूमिका नकुल घाणेकर या तरूण अभिनेत्याला मिळाली. या भूमिकेबद्दल बोलताना नकुल म्हणाला की , “अतुलने साकारलेली हेगडी प्रधानांची ही भूमिका कमालीची लोकप्रिय झाली होती. आपल्या अभिनयातून त्यांनी हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. शिवाय या भूमिकेसाठी त्यांना झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या अचानक जाण्याने माझ्याकडे ही भूमिका आली. या भूमिकेकडून प्रेक्षकांच्या अनेक अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही भूमिका माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे असे मी मानतो. यासाठी मी जय मल्हार मालिकेचे जवळपास सर्व भाग आणि हेगडी प्रधानांची दृश्ये युट्युब आणि डिव्हीडीजवर वारंवार बघितली. त्यातील बारकावे टिपले. यासाठी माझ्याकडे खूप कमी वेळ होता पण मी माझ्यापरीने पूर्ण तयारी केली आहे. अगदी अतुल अभ्यंकरांसारखी भूमिका मी साकारेन की नाही हे मला माहित नाही पण त्याच्या जवळ जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि प्रेक्षकांनाही तो आवडेल अशी आशा मी बाळगतो.”
झी मराठीवर सायंकाळी ७ वा. प्रसारित होणा-या जय मल्हार मधील हा बदल लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.