पुणे-केवळ डॉक्टरांची बाजू घेऊन चालणार नाही तर रुग्णांच्या नातेवाइकांचा तोल का सुटतो ? याप्रश्नासह रुग्णांचीही तक्रार- बाजू समजून घेतली पाहिजे .प्रसंगी डॉक्टरच्या विश्वासाहर्तेला तडा देणाऱ्या खासगी रुग्णालयावर शासनाने ” सर्जिकल स्ट्राईक ” करणे गरजेचे आहे अशी स्पष्ट मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे .
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे कि ,
निवासी डॉक्टर्स च्या संपाने अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून आरोग्यरक्षकांच्या या बेजबाबदार वर्तनाने त्यांच्या प्रति सामान्य जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत.अश्या संपामुळे आणि रुग्णांच्या होणाऱ्या हाल मुळे डॉक्टर्स प्रतीची सहानुभूती अजूनच कमी होण्याची व त्यांच्या वरील विश्वासाला तडा जाण्याचीच शक्यता अधिक आहे.किंबहुना डॉक्टर्स व खासगी रुग्णालयांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल न केल्यास उच्चं न्यायालयाच्या निरीक्षणाप्रमाणे अराजकाचीच चिन्हे आहेत.निवासी डॉक्टर्स ची एकूण भूमिका आणि खासगी रुग्णालयातील अनुभव यांच्या अभ्यास केला आणि नव्वद च्या दशकातील आठवणी जाग्या झाल्या,त्या काळी म्हणजे साधारण २० वर्षांपूर्वी मी पतित पावन संघटनेचा पदाधिकारी असताना पुण्यातील प्रतिष्ठित अश्या रुबी हॉल विरुद्ध आम्ही उभारलेल्या आंदोलनाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली,आणि तदनंतर बुधरानी इनलॅक्स , के इ एम, जहांगीर अश्या विविध रुग्णालयांविरुद्ध जनआंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची होणारी नियोजनबद्ध लूट थांबविण्यात आम्हाला यश आले.अर्थात त्या काळी आम्ही आरोग्यरक्षकांना कुठे ही मारहाण अथवा रुग्णालयाची तोडफोड असे प्रकार न करता नियमांवर बोट ठेवून लढा दिला.मात्र एवढी वर्ष झाली तरी अद्याप परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही.किंबहुना आता अत्याधुनिक उपकरणे व नवनवीन रोगांच्या शोधामुळे डॉक्टर्स चे चांगलेच फावते आहे व रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांची मात्र ससेहोलपट होत आहे,त्यातूनच डॉक्टर्स ला मारहाणीचे प्रकार घडत असून त्यात वाढ होण्याचीच भीती आहे.यासाठी आता शासनाने खासगी रुग्णालयावर ” सर्जिकल स्ट्राईक ” करणे गरजेचे आहे,त्याचप्रमाणे डॉक्टर्स साठी नियमावली,आचारसंहिता आणि विशिष्ठ उपचारांसाठी दर नियमन करणे ही गरजेचे आहे.
सध्या मात्र डॉक्टर्स वर हल्ल्याचे दुःखद प्रकार घडत आहेत.हे का घडते याचा मी प्रॅक्टिकल अंगाने विचार करून काही मुद्दे मांडत आहे ( माझ्याकडे याचे प्रमाण देखील उपलब्ध आहेत आणि रुग्णालयात गेलेल्या प्रत्येकालाच असे अनुभव येतात.काही अपप्रवृत्तीच्या शिरकाव्यामुळे संपूर्ण आरोग्यरक्षकच बदनामीच्या फेऱ्यात अडकले असून या पवित्र व्यवसायाची विश्वासार्ह्यता धोक्यात आली आहे )
मी आरोग्यरक्षकांना काही प्रश्न विचारू इच्छितो ज्याचे संयुक्तिक उत्तर त्यांनी द्यावे …
१) रुग्ण दाखल झाल्यावर ” बकरा सापडल्याचा ” विकृत आनंद काही आरोग्यरक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो व त्यातून मग पेशंटची एकूण आर्थिक परिस्थिती बघून त्याच्या नियोजनबद्ध लुटीचे सत्र सुरु होते.पेशंटच्या नातेवाइकांना ” अरे बाबा तुम्हाला तुमचा पेशंट हवा कि नको,त्याचे इमर्जनसी ऑपरेशन करणे गरजेचे आहे ” असे घाबरवून सोडले जाते आणि मग नातेवाईक हवालदिल होऊन रुग्णालयाने योग्य उपचार करावेत यासाठी शब्दश: कर्ज काढून प्रचंड रकमा भरायला बाध्य होतात. मी स्वतः महिलांना त्यांचे मंगळसूत्र डॉक्टर्स समोर ठेऊन रडत रडत नवरा /मुलगा यांच्यावर उपचारासाठी शब्दश भीक मागताना बघितले आहे.
२) एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला तपासण्या आधीच नातेवाईकांना पैसे भरायला लावले जातात व त्याशिवाय उपचार सुरु केले जात नाहीत.
३) रुग्णाकडे विविध रिपोर्ट्स असले तरी त्याला सर्व तपासण्या पुन्हा करण्याची गळ घातली जाते आणि त्या तपासण्यांचे बिलच काही हजार रुपयात जाते.
४) अत्यवस्थ रुग्णाला सेकंड ओपिनियन ची संधी दिली जात नाही व अन्य डॉक्टर कडे जायचे असल्यास डिस्चार्ज घ्या असे सांगितले जाते.तसेच केस पेपर उपलब्ध करून दिले जात नाहीत.
५) आय सी यु तील रुग्णाच्या नातेवाइकांशी मोकळा संवाद साधला जात नाही व पेशंटच्या स्थिती बाबत खोटा आशावाद दाखविला जातो,तर व्हेंटिलेटर वरील रुग्णाच्या नातेवाइकांना ” तुम्ही निर्णय घ्या आम्ही काही सांगू शकत नाही असे सांगून धर्मसंकटात टाकले जाते व बिल वाढविले जाते.
६) रुग्णासाठीची औषधे ही रुग्णालयातून घेण्याचे बंधन घातले जाते व रुग्णास किती सलाईन लावले किंवा प्रचंड महागडी अशी किती औषधे दिली याची कोणतीही माहिती दिली जात नाही.किंबहुना त्याच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेतला जातो.
७) गरिबांसाठी राखीव खाटांचा हिशोब कुठलीच धर्मादाय संस्था देत नाही व अश्या खाटा रिकाम्या ही नसतात ( राखीव ठेवल्या जात नाहीत )
८) उपचार करणारा डॉक्टर वगळून अन्य डॉक्टर कडे पेशंटच्या स्थितीबाबत विचारणा केल्यास ” अहो चुकीचा उपचार सुरु आहे पण मी लेखी काहीच देणार नाही,पेशंटला माझ्याकडे आणा मग बघू” असे सांगितले जाते आणि यात सर्व तज्ञ डॉक्टर्स ची मिलीभगत असते.मुळात तज्ञ व सिनियर डॉक्टर्स ना अनेक रुग्णालयांना व्हिजिट करायची असते आणि अनेक ऑपरेशन्स करायचे असतात,त्यातून त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस असतेच आणि मग इकडून तिकडे पाळण्याच्या आणि पैसे कमविण्याच्या नादात ना रुग्णाशी संवाद साधायला वेळ असतो ना नातेवाईकांशी.मग जागेवर उपस्थित असलेले डॉक्टर थातुर मातुर उत्तरे देतात आणि रोष ओढवून घेतात.
९) ऑपरेशन करण्यापूर्वी पॅकेज सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात थातुर मातुर आणि न समजणाऱ्या समस्या उद्भवल्या असे सांगून अतिरिक्त बिल आकारले जाते.त्यातून रुग्णाच्या नातेवाईकांची अर्थी घडी विस्कळीत होते आणि वाद उद्भवतात.
१०) एखादाच डॉक्टर स्पष्टपणे ” पेशंट वाचण्याची शक्यता धूसर असून तो उपचाराला प्रतिसाद देईल याची खात्री नाही,तरी तुम्ही म्हणत असाल तर प्रयत्न करू असे सांगतो “
अशी हजारो उदाहरणे देता येतील ज्यातून रुग्णाचे नातेवाईक संतप्त होतात आणि मग अनर्थ घडते.
याचा अर्थ असा नाही कि डॉक्टर्स ला मारहाण समर्थनीय आहे पण इथे हे ही बघितले पाहिजे कि लोकांचा तोल का सुटतो.का डॉक्टर्स अथवा रुग्णालयातील समुपदेशक नातेवाईक किंवा रुग्णाशी योग्य संवाद साधून त्यांना सत्य परिस्थिती सांगून विश्वासात घेत नाहीत ? मला हे मान्य आहे कोणताही डॉक्टर रुग्णावर चुकीचे उपचार करणार नाही किंवा त्याला मृत्यूच्या दाढेत लोटणार नाही.पण वरील प्रत्यक्ष भोगलेली उदाहरणे व आजही रोज येणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी एकूणच आरोग्यरक्षकांची विश्वासार्हता धोक्यात असल्याची सूचक आहे.
डॉक्टरांकडून वा हॉस्पिटल प्रशासन ,परिचारिका,वॉर्ड बॉयस,सुरक्षा रक्षक यांच्याकडून मिळणारी दुरुत्तरे आगीत तेल ओततातच.त्यातून जर पेशंट कडे मेंदी क्लेम किंवा अन्य इंश्युरन्स असेल,तो सी जी येऊ एस चा रुग्ण असेल किंवा त्याचे बिल महानगरपालिका अथवा तत्सम संस्था भारत असेल तर जे घडते ते अभ्यासण्यासारखेच आहे.
मला असे वाटते कि जसे डॉक्टरांवरील हल्ले निषेधार्य आहेत तसेच डॉक्टर्स ने देखील आत्मपरीक्षण व सुधारणा करणे गरजेचे आहे.त्यातूनच परिस्थिती सुधारेल व पूर्वीच्या काळी असलेली फॅमिली डॉक्टर संकल्पना पुन्हा मूळ धरून डॉक्टर्स वरील विश्वास वाढीस लागेल.
त्याच बरोबर जर सर्वच गोष्टींचे दर ठरलेले आहेत तर मग रुग्णओपचाराचे का नसावेत ? याबाबत ही विचार मंथन व नियमन होणे गरजेचे आहे तरच समन्वय साधता येईल अन्यथा परिस्थिती अधिक विकट होईल अशीच चिन्हे आहेत.जशी डॉक्टर्स ची बाजू आहे तशी रुग्णांची देखील; आहे याचा विचार करून योग्य नियमन करावे आणि हे नोबेल प्रोफेशन सुरळीत सुरु राहून परस्पर विश्वास दृढ होईल यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करावेत ही नम्र विनंती.