पुणे-आचार्य अत्रे यांनी ज्या-ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तिथे-तिथे स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले, अशा शब्दात सुप्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले यांनी आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला. आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठानच्यावतीने हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे, राजश्री दवणी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
श्रीमती गोडबोले यांनी मराठी साहित्यातील विनोद परंपरेचा व्यापक आढावा सादर केला. लिळा चरित्रातही विनोदाचे स्थान आढळून येते. संत काव्यात, संस्कृत नाटकातही विनोद आढळून येतो. बाईने चेष्टा करणे तत्कालिन समाजाला मान्य नसल्याने संस्कृत नाटकात विदुषक हा पुरुषच दिसून येतो. लोकसाहित्यातील उखाणे, जात्यावरील गाणी हे विनोदाचेच एक अंग आहे. विनोदी परंपरा प्राचीन असल्याचे सांगून विनोदासाठी उत्स्फूर्तता आणि बुध्दीमत्ता लागत असल्याचे मत त्यांनी व्यकत केले. शि. म. परांजपे, ह.ना.आपटे, श्री.कृ. कोल्हटकर, रा. ग. गडकरी, चिं.वि. जोशी, दत्तू बांदेकर, पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी विनोदी साहित्याला दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. यावेळी गोडबोले यांनी विनोदी प्रसंग, किस्से सांगून विनोदाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट केले.
अॅड कानडे यांनी प्रास्ताविकात हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाच्या आयोजनामागचा हेतू सांगितला. आचार्य अत्रे म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभेची गरुडझेपच होती. त्यांचा जन्म दिन 13 ऑगस्ट हा अखिल भारतीय मराठी विनोद दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास अनेक रसिक उपस्थित होते.