पुणे- पुण्यातील आगामी राजकारणाचे मातब्बर नेतृत्व म्हणून राजकीय वर्तुळातील अनेकांच्या नजरा आता राष्ट्रवादीचे दीपक मानकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर खिळून रहातील असे स्पष्ट चित्र आहे . राष्ट्रवादीने आगामी लोकसभेच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेस कडे पुण्यावर हक्क सांगताना नवा चेहरा डोळ्यासमोर ठेवल्याचे सांगण्यात येत असले तरी राष्ट्रवादीच्या गोटात सर्वत्र दीपक मानकर हेच तगडे नेतृत्व असल्याचे मानले जाते . तर भाजपच्या गोटात संजय काकडे यांचे नाव घेतले जाते . भाजपच्या गोटातील विशिष्ट वलयांकित मंडळी जी पक्षाच्या हिताचा विचार करीत नाहीत,अन्य पक्षांशी मैत्रीचे संबध जोपासण्यास प्राधान्य देतात अशीच मंडळी काकडे यांच्या नावाला विरोध करतील असे बोलले जाते . दरम्यान खासदार वंदना चव्हाण यांनी देखील आता असंख्य वर्षे राजकारणात काढली आणि त्या ही आता पुस्तकी आणि नाटकी सभ्यतेऐवजी वास्तवता लक्षात घेऊन राजकारण करतील असा दावा करण्यात येतो आहे.
म्हणजेच भाजपमध्ये बापट आणि राष्ट्रवादी मध्ये चव्हाण ही जी दोन्ही नावे राजकारणात वैशिष्ट्यपूर्ण मानली जातात त्यांना आता वास्तवतेशी सांगड घालावी लागेल आणि आपल्या पक्षातील खऱ्या आणि जनशक्ती ज्यांच्या सभोवताली आहे अशा पक्षातील मातब्बरांच्या चेहऱ्यांना पुढे न्यावे लागणार आहे असे दिसते आहे . कॉंग्रेसमध्ये कितीही उमेदवार असले तरी लोकसभेला प्रभाव दाखवू शकेल असा चेहरा त्यांच्या कडे नाही हि वास्तवता या पक्षाने स्वीकारली तर सरळ सरळ भाजप आणि राष्ट्रवादी असाच सामना होवू शकणार आहे .
एकीकडे संजय काकडे यांनी लोकसभेची तयारी सुरु केल्याचे बोलले जाते , तर दुसरीकडे राष्ट्रवादी ने लोकसभेचा उमेदवारच गुलदस्त्यात ठेवल्याने भूमिकेबद्दलच संशय देखील व्यक्त होतो आहे . तर अनेकांच्या मते मानकर हे लोकसभा लढविणार नाहीतच ते विधानसभेच्या रणांगणात असतील असे दिसते आहे . या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चा विचार करता या दोन्ही पक्षांकडे लोकसभेसाठी तशी सक्षम उमेदवारांचीच वानवा दिसते आहे . पण जिथे शिरोळे यांच्या सारखे उमेदवार चालले तिथे या दोन पक्षातील अन्य उमेदवार ही चालतील अशी भावना वरिष्ठ नेत्यांनी बाळगावी काय ? असा हि सवाल उपस्थित होतो आहे .