एकात्मतेच्या वातावरणात पहाटेपर्यंत रंगला मुशायरा
पुणे : बदलती राजकीय रचना, काही भागात असलेली सामाजिक अस्वस्थता पण प्रतिकूल परिस्थितीतहि भारतीय जनतेत असलेली एकात्मता याचे प्रतिबिंब शुक्रवारी दि. ६ सप्टेंबर रोजी पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय उर्दू मुशायरा कार्यक्रमात उमटले. हास्य आणि टाळ्यांच्या कडकडाटात शनिवार पहाटे ४ वाजेपर्यंत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना अंतर्मुख करतानाच एकात्मतेचाही संदेश दिला.
पहिल्या पुणे फेस्टिव्हल पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे यंदाचे ३१ वे वर्ष. या महोत्सवाचे संस्थापक सुरेश कलमाडी यांनी हा उत्सव सुरु ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना इकबाल अंसारी यांनी अशा व्यक्तीमुळे ‘जोश पैदा होता है’ असे सांगितले.
आवामी महज पुणे आणि इनामदार स्पेशालिटी हॉस्पिटल, यांच्या वतीने हा मुशायरा सादर करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा आबेदा इनामदार यांनी याचे आयोजन केले होते. ४ शायरा आणि ११ शायर यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद नसीम आरिफ खान तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार होते. महोत्सवाचे संस्थापक सुरेश कलमाडी यावेळी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात पुराच्या काळात आपल्या छोट्याशा मच्छीमारी बोटीतून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ३०० पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची कामगिरी करणारे पुंदी गावाचे एजाज अब्दुल पठाण आणि हसन अब्दुल पठाण या दोघा भावांना पी. ए. इनामदार यांनी प्रत्येक रु. पन्नास हजारांची रक्कम प्रोत्साहन म्हणून प्रदान केली. या दोघा भावांना मानपत्रही देण्यात आले. सामाजिक सलोखा निर्माण करण्यात त्यांना पाठबळ देणारे सरपंच दीपक पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
या मुशायराचे उद्घाटन मोठी मेणबत्ती प्रज्वलित करून झाले. पॉप्युलर मेरठी (मेरठ), मंझर भोपाली (भोपाळ), इक्बाल अश्हार (दिल्ली), रियाज सागर (मुझफ्फरनगर), अफरोज आलम (दुबई), अतुल अजनबी (ग्वालियर), शहीद अदिली (हैदराबाद), शाईस्ता सना (कानपूर), अंजली अदा (काश्मीर), रेहाना शहीन (अलीगड), डॉ. मेहताब आलम (भोपाल), शरफ नांपर्वी (दिल्ली), मुमताज मुन्वर (पुणे) यांनी शेरोशायरीची अक्षरश: बरसात केली. अस्लम चिस्ती यांनी शायरांना आपल्या खास शैलीत खुलवतानाच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा शायरी पेश केली.
मंझर भोपाली यांनी सध्या सामाजिक सलोखा का कमी झाला आहे असा सवाल करतानाच इस देश को किस की नजर लग गाई अशा स्वरुपाची वेदना प्रकट केली. तर डॉ. मेहताब आलम यांनी कौमी एकता के सामने खतरा है असे म्हणताना ‘प्रेम के ढाई अक्षरसे दुनिया का दिल जीता जा सकता है” असा आशावाद प्रकट केला.
“प्यार खुशबू है, ये छुपता नही
आप कितनी भी नजरे छुपा लीजिये”
दिल्लीचे इक्बाल अश्हार यांनी उर्दू भाषेबद्दल अभिमान व्यक्त करताना “हसीनो से कोई हिजारत न करना, ये कम नापते है ये कम तोलते है” असे म्हणून टाळ्या मिळवल्या. त्याच वेळी त्यांनी “मेरी वफाओंको सबूत न मांगे” असेही सुनावले.
ग्वालियरचे अतुल अजनबी यांनी “बडे सलीके, बडे साद्गी से काम कर दिया, जलाके अंधेरेसे इंतकाम लिया” अशी टोलेबाजी केळी.
पुण्याच्या मुमताज मुनव्वर यांनी “नफरते सारी मिट जायेगी एक दिन, दुश्मन को भी दिल से लगा कर देखो, खाक हो जायेंगे नफरत के पतंगे, तुम भी प्यार की शमा जलाकर देखो” या शायरीवर टाळ्या मिळवल्या.
काश्मीरमधून आलेल्या अंजली अदा यांनी पदार्पणातच टाळ्या मिळवल्या. “दिलसे जन्नत का पैगाम लायी हूँ, अपने काश्मीर का सलाम लायी हूँ, सिलसिला प्यार का युही चलता रहे, वो न बदले जमाना बदलता है” या शायरीने श्रोत्यांची मने जिंकली.
हैदराबादचे शहीद अदिली यांची प्रेमाची गंमत सांगणारी शायरी रंगली “चार दिन मेकअप मे थी, घर मे उजाला हो गया, चार दिनकी चांदनी थी, फिर अंधेरा हो गया, मैने अपनी अहमियत को खूब पिया ख्वाबो मे, फिर हुवा बेजार मै, ख्वाब उलटा हो गया!”
रेहाना शहीन यांनी राजकारण्यांबाबत वेदना व्यक्त करताना शायरी पेश केली. “तुम दिलोंको बाट रहे हो कुर्सीके वास्ते टुकडोंमे मेरे देशको तकसीम ना करो.”
इक्बाल अश्हार यांनीही देशावरच्या आमच्या निष्ठेचे हेच काय फलित अशी वेदना व्यक्त करताना “एडिया रगडी थी इस नहर मे मैने, लेकीन पानी न भरने देते ये लोग” अशी शायरी पेश केली.
दुबईहून आलेले अफरोज आलम यांनी ही अशाच वेदना व्यक्त केल्या “तू मेरी नींदे तलाशता है ये भी बहुत है, तू मेरी ख्वाबो मे जागता है ये भी बहोत है” या ओळी पेश केल्या.
मेहताब आलम म्हणाले की “आप बरसाओ मोहब्बत के फूल, आपका जिक्र किया जायेगा खुशबू की तरहा.
अखेरच्या टप्पात कानपूरच्या शाईस्ता सना यांनी त्यांच्या पहाडी आवाजात सादर केलेल्या जबरदस्त शायरीने रसिकांवर मोहिनीच घातली आणि भरपूर हसवताना अंतर्मुखही केले “समझमे नही आता की अब कहाँ जाऊं, जिसके वास्ते जिंदा हूँ उसीने मार दिया”.
देशविदेशात आपला उर्दू शायरीने लोकप्रिय असलेले मेरठचे पॉप्युलर मेरठी यांनी समारोपात शायरी पेश केली तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. रसिक त्यामुळे अधिक उत्साहित झाले आणि दीर्घकाळ चाललेल्या कार्यक्रमात खूप काही मिळाल्याच्या भावनेत रमून गेले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री नसीम खान यांनी देशाची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरु आहे, असे मत व्यक्त करताना सरकार कोणाचेही असले तरी देश महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी एकजुटीने आव्हानांचा सामना करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रेक्षिकांनी मोठी गर्दी केली होती.