पुणे- पत्रकारितेला साहित्य गुणांची जोड मिळाली तर त्यातून निर्माण होणारी साहित्य कृती किती उत्कृष्ट असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुविख्यात साहित्यक सुरेश द्वादशीवार आहेत. त्याचा प्रत्यय त्यांच्या ‘हाकुमी’, ‘तांदळा’ आणि ‘अलकनंदा’ या तीन कादंबऱ्या वाचताना आपल्याला येतो असे गौरोद्गार सिद्धहस्त लेखक व अंतर्नादचे संपादक भानू काळे यांनी काढले.
सुविख्यात साहित्यिक व संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘हाकुमी’, ‘तांदळा’ आणि ‘अलकनंदा’ या तीन कादंबऱ्यांच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सिद्धहस्त लेखक व अंतर्नादचे संपादक भानू काळे यांच्या हस्ते एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन येथे रविवारी संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ व प्रथम बुक्सच्या संपादक संध्या टाकसाळे, सुरेश द्वादशीवार, लाटकर प्रकाशनचे आनंद लाटकर हे उपस्थित होते. विनोद शिरसाठ व संध्या टाकसाळे यांनी या कादंबऱ्यांचे विवेचन केले.
भानू काळे म्हणाले, पुष्कळदा पत्रकार व साहित्यिक हे दोन्ही व्यवसाय परस्परांना मारक आहेत असे म्हटले जाते.
पत्रकाराला बहिर्मुखता आवश्यक असते तर साहित्यिकाला अंतर्मुखता आवश्यक असते, पत्रकारांना कायम बाहेर फिरावे लागते तर लेखकाला एकांत हवा असतो. मात्र, पत्रकारितेचे सामर्थ्य हे देखील साहित्याला एका उंचीवर नेते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश द्वादशीवार हे आहेत. सध्याच्या पत्रकारितेला साहित्याचा फारसा वारसा नाही. त्यांच्या लेखनात लालित्य नसल्याने बातम्या वृक्ष वाटतात. त्यामुळे बातम्यांना रंजकतेची जोड नसते. द्वादशीवार हे साहित्य व पत्रकारिता यांची सांगड घालणारे लेखक असून ते एक उत्तम पत्रकार असताना एक उत्तम साहित्यिक कसे बनले हे एक कोडे आहे.
‘तांदळा’ या कादंबरीविषयी बोलताना काळे म्हणाले, ‘तांदळा’ ही मुखवटे धारण करणाऱ्या एका स्रीची कथा आहे.
मुखवटे किती क्लेशदायक असतात आणि क्रौर्य हे मुखवट्यांशी कसे जोडले गेले आहे हे आपल्याला ही कादंबरी वाचताना लक्षात येते. ‘हाकुमी’ या कादंबरीविषयी बोलताना ते म्हणाले, जगातल्या सर्वच समाजात आदिवासी हा प्रकार आढळतो व ते एक विलक्षण कोडे आहे. आदिवासी अजूनही समाजाशी एकरूप झालेले नाहीत. प्रयत्न करूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेण्यास समाज कमी पडला आहे का हा संशोधनाचा विषय आहे.
अलकनंदा या कादंबरीविषयी बोलताना ते म्हणाले, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जगात अस्तित्वात असतात हे ही कादंबरी वाचताना लक्षात येते. आपल्या अवतीभवती असंभवनीय गोष्टी असतात त्याचे वर्णन करण्यासाठी ललित साहित्य हे मध्यम आहे.लिखाणात सामाजिक आशय महत्वाचा असतोच मात्र लेखकाचे कौशल्य व लिखाणाची धाटणीही महत्वाची असते हे सर्व द्वादशीवार यांच्या लिखाणात बघायला मिळते.
द्वादशीवार म्हणाले, या तीनही कादंबऱ्या या सत्यकथा आहेत. आपल्या आत्मसाक्षाकारातून कोलमडलेल्या एका बाईला उभा करण्याचा प्रकार म्हणजे ‘तांदळा’ ही कादंबरी आहे. स्रीचे अस्तित्व नाकारणे हा सामाजिक दुष्टव्याचा भाग आहे. स्रीला स्री म्हणून जगायचे आहे मात्र समाज तिला स्री म्हणून जगू देत नाही. ‘तांदळा’ ही एका अर्थाने वैचारिक परंतु सत्य कथा आहे. ‘हाकुमी’ हा आमच्या कुटुंबातील भाग आहे. तीही सत्य कथा आहे असे सांगून द्वादशीवार म्हणाले, समाजाला खोटं व गुळमिळीत किती सांगायचे , कधीतरी त्याच्या समोर आरसा धरला पाहिजे व समाजाला त्याचा खरा चेहरा दाखवला पाहिजे. सामाजिक संबंध म्हणजे भूमिकांचे व मुखवट्यांचे संबंध आहेत, माणसांचे संबंध कुठे आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपण सर्वजन मुखवट्यांचे सामाजिक संबंध जपण्यात गुंतलो आहोत अशी टिप्पणीही त्यांनी केली.माणसे माणसांना माणूस म्हणून भेटली पाहिजेत हा या कादंबऱ्या लिहिण्यामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद लाटकर आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले, या तीनही कादंबऱ्या उत्कृष्ट आहेत. द्वादशीवार हे आधुनिक काळातील वाल्मिकी आहेत हे आपल्याला त्यांची ‘हाकुमी’ ही कादंबरी वाचताना लक्षात येते. आपले विचार व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध आहेत. द्वादशीवार यांनी आपले विचार कादंबरीतून मांडले त्यामुळे त्यांच्या या तिन्ही कादंबऱ्या दर्जेदार झाल्या आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निहारिका मोकाशी यांनी मानले.