लोकसहभागातून नद्या जलपर्णी मुक्त करणे शक्य :प्रदीप वाल्हेकर
पुणे :जीविधा, निसर्गसेवक व देवराई फाऊंडेशन या संस्थांतर्फे तर्फे ” जलपर्णी मुक्त ,स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान” या विषयावर पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते प्रदीप वाल्हेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
बुधवार दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर,दत्तवाडी येथे हे व्याख्यान झाले . प्रदीप वाल्हेकर म्हणाले ,’ आपल्या देशातील सर्व नद्या जलपर्णी या विदेशी वनस्पतीने भरल्या आहेत. यामुळे एका बाजूला नदी पात्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे तर दुसरीकडे डासांची संख्या वाढत आहे. जलपर्णी निर्मुलन हा मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा आहे. फक्त कंत्राटे देऊन जलपर्णी नदीतून पुढे ढकलली जाते ,पण नष्ट होत नाही . आम्ही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन रोटरी आणि लोकसहभागातून जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई हे जीवनध्येय मानून अभियान सुरू केले आहे. स्वतःच्या खिशातून लाखो रुपये घालून आम्ही पवना नदी जलपर्णी मुक्त करण्याचे काम करत आहोत .
नदी स्वच्छ ,प्रवाही ,निर्मळ ठेवण्याच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्त्यांची फौज याकामी उभी राहिली आहे. जलपर्णी पक्व होण्याआधी काढली तरच ती परत परत येणार नाही हे या अभियानाचे सुत्र आहे. या मोहिमेची माहिती व्याख्यानातून देण्यात आली .
जलपर्णी चे पुनरुत्पादन चक्र तोडणे हाच एकमेव उपाय असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले . पाण्यातील जलपर्णीला फुले ,फळे आली की हजाराच्या पटीत बिया नदीत पसरून जलपर्णीची भयानक वाढ होते . आणि नदीचे पात्र भरून जाते . जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते आणि पवनेच्या काठच्या गावांना तेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी खर्च करावा लागतो .
जलपर्णी नष्ट करण्याच्या बाबतीत पालिका ,प्रशासन ,गावकरी यांच्यात जागृती घडवून एकत्रित कामाची गरज असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले .
पवनेपाठोपाठ इंद्रायणी नदी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली .
धनंजय शेडबाळे यांनी प्रास्ताविक केले . यावेळी जीविधा ‘चे संचालक राजीव पंडित ,उष:प्रभा पागे ,शैलेंद्र पटेल तसेच अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य होते .