पुणे-शहर आणि परिसरात सुमारे ३८७ बांधकामे धोकादायी असल्याची महापालिका दप्तरी नोंद असून या आठवड्यात पालिकेने ३५ धोकादायी बांधकामे उतरवून घेतली आहेत .एकंदरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे उतरवून घेणे महापालिकेसाठी जिकीरीचे ठरताना दिसत आहे .दुसरीकडे नागरी जीवितास हानी पोहोचेल अशा धाकादायी इमारतीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीसाना देखील आहेत पण दरवर्षी पालिका कारवाई करते आणि पोलीस निव्वळ तुम्ही कारवाई करा हवा तर बंदोबस्त आम्ही देतो अशी नाममात्र भूमिका घेत असल्याचे आजवर दिसून आले आहे .पालिकेच्या अधिकार्यांना मुख्य सभेत उत्तरे द्यावी लागतात पण पोलिसांना मात्र अशी उत्तरे द्यावी लागत नसल्याने कायद्याने त्यांच्यावर असलेल्या भटकी कुत्री ,धोकादायी बांधकामे अशा विविध जबाबदाऱ्या पासून ते अलगद अलिप्त राहत असल्याचेच आजवर दिसून आले आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई हे पोलिसांचे सूत्र नागरी हानीस कारणीभूत ठरताना वारंवार दिसत आले आहे. गुन्हा अगर दुर्घटना घडन्यापुर्वी योग्य उचित हालचाली पोलिसांनी केल्या तर बरीचशी हानी टाळता येवू शकते याकडे सातत्याने दुलाक्ष करण्यात येत आहे . निव्वळ जुनी बांधकामे, नव्याने हलगर्जीपणाने केलेली बांधकामे धोकादायी प्रकारात मोडतात असेच नाही तर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इमारतीपैकी काही भाग आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतींपैकी काही भाग देखील धोकादायी झाल्याच्या बातम्या आहेत .बहुतांशी धोकादायी बांधकामांची माहिती अगर येनकेन प्रकारे अशा बांधकामांशी अप्रत्यक्ष का होईना राजकीय कार्यकर्ते नेते यांचा संबध असतो असे दिसून येत असते त्यांची चाल ढकल देखील गंभीर असल्याची बाब बोलून दाखविली जाते .
दरम्यान सुरक्षाभिंत तसेच इमारत पडण्याच्या घटना घडू लागल्याने धास्तावलेल्या महापालिका प्रशासनाने पुणे पोलिसांना पत्र पाठवून शहराच्या मध्यवस्तीतील २९२ वाड्यांतील नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याची विनंती केली आहे. या नागरिकांना विनंती करून तसेचनोटिसा बजावूनही ते सुरक्षित ठिकाणी जात नसल्याने प्रशासनाने पोलिसांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
पालिकेच्या बांधकाम विभागाने तसे पत्र पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना दिले असून, त्यात या वाड्यांतील नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविणे गरजेचे असल्याने यामध्ये पोलिसांनी मदत करण्याची विनंती केली आहे. पालिकेने गेल्यावर्षी धोकादायक अवस्थेतील २९२ वाडे शोधले होते. यंदा त्यात नव्याने ३२ वाड्यांची भर पडली आहे. त्यातील सहा वाडे पाडण्यात आले असून, आणखी तीन वाडे पाडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्या २९२ वाड्यांतील नागरिक आपली घरे सोडत नसल्याने त्यांना घराबाहेर काढणे गरजेचे बनले आहे. भाडेकरू, घरमालक या वादांत तसेच आपले घर जाण्याच्या भीतीने नागरिकांकडून घरे सोडण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे इमारती, वाडे तसेच सुरक्षा भिंती पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पावसाच्या पहिल्याच आठवड्यात कोंढवा आणि सिंहगड कॉलेजच्या परिसरात घडलेल्या घटनेत २१ मजुरांचा मृत्यू झाला. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत प्रामुख्याने गावठाणात २९२ वाडे धोकादायक अवस्थेत आहेत. या वाड्यांतील नागरिकांना घरे खाली करण्यासाठी वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी त्यांच्याकडून घरे खाली करण्यात येत नाहीत. वाडे पडल्यास दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या वाड्यांतील नागरिकांना घरे खाली करण्यासाठी पोलिसांची मदत मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने थेट पोलिस आयुक्तांनाच साकडे घातले आहे.वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये बहुतांश भाडेकरूंचा समावेश आहे. गरिबीमुळे बाहेर घर मिळवून राहणे परवडणारे नाही. वाड्यातील घर सोडले तर पुन्हा घर कधी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे या नागरिकांकडून घरे सोडण्यात अनिच्छा व्यक्त करण्यात येते. पालिका प्रशासनालाही त्यांची व्यथा समजत असली तरी, सुरक्षिततेच्या मुद्द्यावर त्यांना हलविणे गरजेचे बनले आहे. काही नागरिकांकडून या घरांच्या बदल्यात पालिकेची घरे मिळावीत, अशी विनंती करण्यात येत आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणातील बाधितांसाठी असलेली घरे जुन्या वाड्यांत राहणाऱ्या नागरिकांना देण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाला मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान पुलगेट परिसरातील दुमजली घराची भिंत आणि लगतचा जिना सोमवारी दुपारी पडल्यामुळे सहाजण घरात अडकले होते. या सर्वांची अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर आणि शिडीच्या मदतीने सुटका केली. नारायण गंगाधर सोनवणे (वय ५५), साक्षी प्रदीप सोनवणे (वय १७), यश प्रदीप सोनवणे (वय-आठ), लीलाबाई गंगाधार सोनवणे (वय ८०), वैशाली प्रदीप सोनवणे (वय ३६) आणि अंजली अतुल सोनवणे (वय २०) अशी सुखरूप सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.