सातव्या ‘भारतीय छात्र संसदे’चा मंगळवारपासून प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; तीन दिवस होणार विचारमंथन
पुणे,: माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसांच्या (17 जानेवारी ते 19 जानेवारी 2017) सातव्या भारतीय छात्र संसदेची मंगळवार, दि. 17 जानेवारी 2017 पासून माईर्स एमआयटीच्या प्रांगणामध्ये सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता या छात्र संसदेचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. श्री. विजय गोयल आणि महाराष्ट्राचे संसदीय कामकाज मंत्री ना. श्री. गिरीश बापट हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनप्रसंगी लोकसभेचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते मा. श्री. सोमनाथ चटर्जी यांना जीवन गौरव पुरस्कार, पुणे येथील राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांना गार्गी पुरस्कार, माजी केंद्रीय राज्यमंत्री व राज्यसभा खासदार श्रीमती रानी नराह यांना मैत्रेयी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी पुण्याचे महापौर श्री. प्रशांत जगताप, सुप्रसिध्द संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, तसेच, मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. एचबीएस क्लब ऑफ इंडिया, नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांच्या सहकार्याने ही संसद भरवण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही याला पाठिंबा दिला आहे.
छात्र संसदेचा समारोप गुरुवार, दि. 19 जानेवारी 2017 रोजी दुपारी 2.00 वाजता होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री ना.श्री.प्रकाश जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री ऊर्जा व खनिज (स्वतंत्र कार्यभार) ना.श्री. पियूष गोयल आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्रिपूराचे मुख्यमंत्री श्री. माणिक सरकार यांना ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या सरचिटणीस रो. पॅट्रिशीया स्कॉटलंड या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आपला संदेश देतील. समारोप समारंभावेळी महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. राजेश टोपे, महाराष्ट्राचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.पद्माकर वळवी, फोर्ज मोटारचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, कृषीतज्ज्ञ श्री. सुभाष पालेकर, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. तुषार गांधी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवस चालणार्या या छात्र संसदेत सहा सत्रांचे आयोजन केले आहे.
त्यामध्ये पहिले सत्र मंगळवार, दि. 17 जानेवारी रोजी दुपारी 3.15 वाजता सुरू होणार आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य : अतिरेकाची परिसीमा कोणती?’ या विषयावर अरुणाचल प्रदेश येथील राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. टामो मिबांग आपले विचार मांडतील. पुद्दुचेरी विधानसभेचे अध्यक्ष व पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री श्री. व्ही. वैथिलिंगम हे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी हिमाचल प्रदेशच्या कासौली सोलन येथील आमदार डॉ. राजीव सैझल व जम्मू-काश्मीरच्या बनिहाल येथील आमदार श्री. विकार रसूल वाणी यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने (आयडियल यूथ एमएलए) गौरविण्यात येईल. अॅड. स्वाती नखाते, अभिनेते श्री. मनोज तिवारी, टाईम्स नाऊचे माजी मुख्य संपादक श्री. अर्णब गोस्वामी हे या सत्रात भाग घेणार आहेत.
याशिवाय विशेष असे दोन ‘यूथ टू यूथ कनेक्ट’ सत्र होईल.
दुसरे सत्र बुधवार, दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता सुरू होईल. ‘वसाहतवादी मानसिकता : एक समृद्ध परंपरा की अभिशाप?’ या विषयावर पश्चिम बंगाल येथील विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. स्वपन कुमार दत्त, आपले विचार मांडतील. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्षपदी असणार आहेत.
पश्चिम बंगाल व छत्तीसगढचे आमदार श्री. दिपेंन्दू बिश्वास व श्री. दीपक बैज यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने (आयडियल यूथ एमएलए) गौरविण्यात येईल. इंडो-अमेरिकन ग्रॅमी पुरस्कार विजेते श्री. रिकी केज हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशच्या मथुरा वृंदावन येथील आचार्य श्री पुंडरीक गोस्वामी यांना युवा आध्यात्मिक गुरु पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. विनय सहस्त्रबुध्दे व चित्रपट दिग्दर्शक श्री. महेश भट हे यावेळी भाषण करणार आहेत.
तिसरे सत्र बुधवार, दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजता सुरू होणार आहे. ‘जात आधारित आरक्षण : सामाजिक न्याय की संपूर्ण अन्याय?’ या विषयावर राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक पी. काणे आपले विचार मांडतील. जम्मू काश्मीर विधान परिषदेचे उपसभापती श्री. जहांगीर हुसेन मीर अध्यक्षस्थानी असतील. राजस्थानच्या आमदार श्रीमती सोनादेवी व आसामचे आमदार श्री रुपज्योती कुर्मी यांना आदर्श विधायक पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तसेच मराठा क्रांती मूक मोर्चाचे संघटक श्री. विनोद पाटील, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. अशोक तन्वर हे प्रमुख वक्ते असतील. तसेच या सत्रामध्ये श्रीमती कविता शर्मा-जोशी (राजस्थान), श्रीमती रितू जैस्वाल (बिहार), श्रीमती सोनिया सिंग (हरियाणा), श्री. सुदर्शन चौधरी (महाराष्ट्र), श्रीमती नजमा खान (हरियाणा) व कुमारी भक्ती शर्मा (मध्य प्रदेश) यांना उच्च शिक्षित आदर्श युवा सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
चौथे सत्र बुधवार, दि. 18 जानेवारी रोजी दुपारी 2.15 वाजता सुरू होणार आहे. ‘भारताची नवीन ओळख : एक जागतिक दृष्टिकोन.’ या विषयावर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एम. जगदीश कुमार आपले विचार मांडतील. कर्नाटक विधानसभेचे सभापती श्री. के. बी. कोलीवाड हे अध्यक्षस्थानी असतील. मध्य प्रदेशच्या आमदार श्रीमती पारुल साहू व केरळचे आमदार श्री. व्ही. टी. बलराम यांना आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार (कौशल्य विकास आणि उद्योजगता) ना. श्री. राजीव प्रताप रुडी, तिबेटचे पंतप्रधान डॉ. लोबसन सांगे, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री. महेश भट, सुप्रसिद्ध पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, श्रीमती अनुराधा प्रभूदेसाई, श्री. अमितवा त्रिपाठी व श्री. आनंद सुदर्शन हे मनोगत व्यक्त करतील. तसेच भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष पद्मविभूषण डॉ. मॉन्टेक सिंग अहलुवालिया हे व्हिडीओे कॉन्फरन्सिंग द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
पाचवे सत्र गुरुवार, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता सुरू होणार आहे. ‘काळा पैसा आणि निवडणुका : मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल?’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये जम्मू विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आर. डी. शर्मा आपले विचार मांडतील. अध्यक्षस्थानी नागालँड विधानसभेचे सभापती श्री. छोटीसुह साझो हे असतील. यावेळी ओरिसाचे आमदार श्री. अनुभव पटनाईक व मिझोरमचे आमदार श्री. चालरोसंघा राल्टे यांना आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येतील. भारताचे माजी निवडणुक उच्च आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव, भारताचे माजी निवडणुक उच्च आयुक्त श्री. एन. गोपाल
स्वामी व काँग्रेसचे प्रचार सल्लागार श्री. शशांक शेखर शुक्ला हे या विषयावर विचार मांडतील. भारताचे केंद्रीय मंत्री ना. श्री. एम. वेंकय्या नायडू हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
सहावे सत्र गुरुवार, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजता होणार आहे. ‘बहुराष्ट्रीय कंपन्या : तारक की मारक?’ या विषयावर केरळ विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. पी. के. राधाकृष्णन हे आपले विचार मांडतील. अध्यक्षस्थानी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती श्री. डी. एच. शंकरमूर्ती हे असतील. गुजरातच्या आमदार श्रीमती संगीताबेन पाटील व हरियाणाच्या आमदार श्रीमती कविता जैन यांना आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येतील. योगगुरू स्वामी रामदेवबाबा, सुप्रसिद्ध मुस्लिम विचारवंत मौलाना सय्यद कलबे रशीद रिझवी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते व क्वालिफाइड लर्निंग सिस्टिमचे संस्थापक श्री. शिव खेरा, डॉ. जुल्फी शेख व भारतीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. मधु गौड यास्की हे आपले विचार मांडतील.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, भारतीय छात्र संसद फौंडेशनचे संस्थापक आणि माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक, डॉ. संजय उपाध्ये, भारतीय छात्र संसदेचे सहनिमंत्रक व एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक प्रा. डी. पी. आपटे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संचालक डॉ. एस. हरिदास, मिटसॉम कॉलेजचे संचालक डॉ. आर. एम. चिटणीस व एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिकाडॉ. सायली गणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.