पुणे : विप्रसेवा ग्रुप, विश्वशक्ती फौंडेशन आयोजित सामुदायिक व्रतबंध (मुंज) सोहळा पार पडला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर येथे झालेल्या या सोहळ्यात १८ बटूंची मुंज करण्यात आली. या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यानंतर गिरीश बापट यांनी शुभाशीर्वाद दिले. चांगले आयुष्य जगण्यासाठी संस्कारांची शिदोरी अतिशय महत्वाची असते. अशा उपनयन संस्कार सोहळ्यातून ते मिळतात. त्यामुळे याचे महत्व अबाधित आहे, असे बापट यांनी सांगितले.
चिन्मय फाटक यांच्या हस्ते भगवान परशुरामांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात झाली. या २८२ वर्षे जुन्या पेशवेकालीन मंदिराच्या प्रसन्न वास्तूत मंदिराच्या शिखरात असलेला नगारखाना ही वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. येथे बसून नगारा वाजविला तर तो मंदिराच्या गाभाऱ्यात वाजविला जातोय असे ऐकणाऱ्यास वाटते. मौजीबंधन संस्काराबरोबरच आधुनिक काळात व्यायाम, मैदानी खेळ, अन्याय सहन न करणे हेही संस्कार तितकेच महत्वाचे आहेत आणि ते अशाच कार्यक्रमातून दिले गेले पाहिजेत, असे संस्थापक चिन्मय फाटक म्हणाले. या सोहळ्यासाठी ग्राहक पेठचे संचालक सूर्यकांत पाठक, मार्गदर्शक अनिल गानूकाका, पुरोहितांचा सद्गुरू ग्रुप आणि अखिल ब्राह्मण संघाचे विशेष सहकार्य लाभले.