देशाच्या विकासासाठी जगण्याचा दर्जा सुधारावा -डॉ. प्रभात रंजन
पुणे : “देश विकसित होण्यासाठी केवळ संरचनात्मक विकास होऊन चालणार नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे,” असे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रभात रंजन यांनी सांगितले. ‘व्यवस्थापन व समाजशास्त्रात बहुशाखीय संशोधन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रभात रंजन बोलत होते.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (डीवायपीआयएमएस) आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बिझनेस स्टँडर्ड चे सीओओ सचिन फणशिकर, संस्थेचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, कार्यकारी संचालक निवृत्त विंग कमांडर पीव्हीसी पाटील, कॉर्पोरेट रिलेशन प्रमुख डॉ. जे. जी. पाटील, प्रा. शिवाजी माने उपस्थित होते.
डॉ. रंजन यांनी २०३५ मधील तंत्रज्ञानाने समृद्ध भारताची प्रतिमाच विद्यार्थ्यांसमोर उभी केली. ते म्हणाले, “या विकसनशील भारतापुढे जीवनावश्यक गोष्टी जसे आरोग्य, अन्न, शिक्षण, इंधन, निवारा यातील आव्हाने मोठी आहेत. या गोष्टी सर्वसामान्यांना पुरवून त्यांच्या जगण्याचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन करावे.”
फणशिकर म्हणाले, “तुमचे ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता, माहिती व्यवस्थापन या गोष्टींना अधिक महत्व असते. त्यासाठी वाचायला हवे, स्वतःला अद्ययावत माहितीने परिपुर्ण करायला हवे. आपल्या भवताली काय सुरु आहे, याची जण आपल्याला असायला हवी. बाहेरचे जग फार आव्हानात्मक आहे, त्यात टिकून राहायचे असेल, तर सतत धावावे लागेल.”
या दोन दिवसांच्या परिषदेत डॉ. मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली एमटीएचआर ग्लोबल पुणेचे सहसंचालक राजेश कामत, जॉबमोसीसचे कार्यकारी व्यवस्थापक समीर आगाशे यांनी परिसंवादात भाग घेतला. आयआयटी पवईच्या शैलेश मेहता, स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. इंद्रजित मुखर्जी यांनीही मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय पातळीवरील शोधप्रबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये आंध्रप्रदेश येथील शिवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे व्ही. आदित्य, विक्रम रेड्डी व आर. के. एस. हरीश यांनी प्रथम, तर डीवायपीआयएमएसची अश्विनी पोतदार व तामिळनाडूच्या गायत्री यांनी संयुक्तरित्या द्वितीय पारितोषिक मिळवले. गुजरातचा देवेंद्र पटेलने तृतीय पारितोषिक पटकाविले.
प्राध्यापकांत आंध्रप्रदेश येथील शिवा शिवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डॉ. एन. सी. राजलक्ष्मी यांनी प्रथम, गुजरातच्या एल. जे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजचे जिग्नेश विदानी, डॉ. नेहा मेहता यांनी द्वितीय, तर जी. एल. एस. विद्यापीठ अहमदाबादचे प्रा. देवर्षी उपाध्याय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. निधी दत्ता यांनी सूत्रसंचालन केले. मिलन वाघ यांनी आभार मानले.