बारामती: देशात डाळींब लागवड क्षेत्रात वाढ झाल्यामुळे उत्पादनातही वाढ झालेली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जेदार व निर्यातक्षम डाळींब उत्पादन घ्यावे लागणार आहे. पीक व्यवस्थापन शास्त्राद्वारे दर्जेदार डाळींब उत्पादन घेणे शक्य असल्याचे मत आत्मा, पुणेचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर यांनी व्यक्त केले.
कृषी विभागाअंतर्गत आत्मा, पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम डाळींब उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, महाराष्ट्र राज्य डाळींब बागायतदार संघाचे अध्यक्ष शहाजी जाचक, प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, सोलापूर डाळींब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ श्रीमती ज्योत्स्ना शर्मा, आकाशवाणीचे कैलास पिंगळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शाकीरअली सय्यद, डॉ. मिलींद जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्प संचालक श्री. बोरकर म्हणाले, डाळींब पिकाचे क्षेत्र वाढले आहे. वैयक्तिक फायद्यासाठी शेतकऱ्यांची विविध प्रकारच्या औषध विक्रीतून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. चांगल्या व दर्जेदार मालाच्या उत्पादनासाठी पीक व्यवस्थापन शास्त्र शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवशीय शिबीरातून शेतकऱ्यांच्या डाळींब फळ पीकाच्या शंकेचे निरसन होणार असून त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे.
श्री. राजेंद्र पवार यावेळी म्हणाले, पुणे, सातारा व सोलापूर या भागातील हवामान डाळींब फळ पिकासाठी पोषक आहे. डाळींब काटेरी झुडूप असून त्याची नैसर्गिता पहाणे महत्वाचे आहे. डाळींब उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी उत्पादन वाढीकडे लक्ष दिले पाहिजे.
डाळींब बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री. जाचक यावेळी म्हणाले, डाळींब पिकासाठी पाणी, औषध व्यवस्थापन होणे महत्वाचे आहे. अनावश्यक फवारण्या टाळल्या पाहिजेत. शेतातील सेंद्रीय कर्ब वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोलापूर डाळींब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ श्रीमती ज्योत्स्ना शर्मा यांनी डाळींब फळ पिकावरील तेल्या व मर या रोगावरील नियंत्रण व उपचार याविषयी सखोल माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही केले.
वरिष्ठ शास्त्रज्ञ शाकीरअली सय्यद यांनी कृषी विज्ञान केंद्रात राबविण्यात आलेल्या मधमाशी प्रकल्पाविषयी माहिती दिली. मधमाशीमुळे फळपिकावर फवारणीमध्ये घट झाल्याचे सांगून शिबीराचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलींद जोशी यांनी केले. या शिबीरास पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.