पुणे,–सैनिकांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना सैनिकांपर्यत व त्यांच्या कुटूंबापर्यत पोहोचण्यासाठी नागरिकांनी योजनांचा प्रचार करावा, असे आवाहन लेफटनंट कर्नल (निवृत्त) सतिश नवाथे यांनी आज येथे केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम आज झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. येथील सैनिक कल्याण विभागाच्या महासैनिक लॉन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल(नि) सुहास जतकर,ब्रिगेडीयर जे.के.तिवारी, कर्नल (निवृत्त) सदानंद साळुंके, ब्रिगेडीयर धिरज मोहन, कमोडोर के.पी.अरविंदन, एअर मार्शल आर.ए.मसलेकर, तहसीलदार उमेश पाटील उपस्थित होते.
देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या व शहीदांच्या कुटूंबांच्या पुनर्वसन व कल्याणासाठी ध्वज निधी गोळा करण्यात येतो असे सांगून लेफटनंट कर्नल नवाथे म्हणाले की, ध्वज निधीमध्ये प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे आहे. विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.मध्ये भरती होण्यासाठी शाळांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. ध्वज निधी संकलनामध्ये जिल्हयातील शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. संकलीत झालेल्या निधीचा वापर माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबाकरिता विविध योजना राबविण्यासाठी करण्यात येतो अशी माहिती त्यांनी दिली.
तहसीलदार उमेश पाटील यांनी आपल्या भाषणात सैनिकांच्या व त्यांच्या कुटूंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांना ध्वज लावून ध्वज निधी संकलनाचा शुभारंभ् करण्यात आला. ध्वज निधी संकलनात स्पृहणिय कामगिरी केलेल्या विद्यार्थी, शाळांचा व शासकीय कार्यालयांचा ब्रिगेडीयर जे.के.तिवारी यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. वीर माता व वीर पत्नी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सैनिकांच्या पाल्यांनी राज्याचे विविध क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल शाल, श्रीफळ व पुरस्काराचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. दिप प्रज्वलनानंतर देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना स्मृतीस पुष्पचक्र अपर्ण करुन मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) बिपीन शिंदे यांनी केले. गेली 68 वर्षे ध्वज दिन निधी संकलन करण्यात येत आहे असे सांगून, 2015 या वर्षात 2 कोटी 11 लाख रुपये ध्वज निधी संकलनाचे उद्दीष्ट दिले होते अशी माहिती त्यांनी दिली. दिलेल्या उद्दीष्टाच्या 110 टक्के ध्वज निधी संकलन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. चालू वर्षी देण्यात आलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी राष्ट्रीय कार्य म्हणून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कृष्णा वाघमारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास वीर पत्नी, वीर माता, शौर्यपदकधारक अधिकारी व सैनिक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.