पुणे. :-पाण्याचा साठा करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने मी जिल्ह्यात जनआंदोलन करणार आहे. या लोकचळवळीसाठी शासनातर्फे निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी व्यक्त केला. उंड्री-पिसोळी नजीकच्या वडाची वाडी येथील तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ बापट यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पीएमआरडीएच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, वडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय बांदल, उपसरपंच जिजाबा बांदल, माजी सरपंच बबन बांदल, शिवाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट यावेळी म्हणाले, ‘पाझरतलावाच्या माध्यमातून पाणी साठवण क्षमता वाढवून भविष्यात पुरेल अशा पाणीसाठवणीचे नियोजन करावायचे आहे. पाझर तलावाच्या एकूण कामकाजासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपये तर पीएमआरडीएच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांतील तलावांतील गाळ काढण्यासाठी पीएमआरडीएच्या वतीने तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तलावातील गाळ काढून साठवण क्षमतेत वाढ झाल्यास भीषण उन्हाळा जाणवणार नाही. एक महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. वडाचीवाडीचा पाझर तलाव हा महाराष्ट्रातील आदर्शवत पाझर तलाव करणे आमचे उदिष्ट आहे. ग्रामस्थांनी देखील पाण्याच्या प्रश्नासाठी एक होऊन काम करणे गरजेचे आहे. पाझर तलावाच्या कामाची गतिशीलता पाहण्यासाठी कामाचे चित्रीकरण केले जाईल. पीएमआरडीए व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वेळोवेळी लागेल ती मदत ग्रामस्थांना करण्याचे आव्हान यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
वडाचीवाडी येथील तलावातील गाळ काढण्यासाठी दोन जे.सी.बी. मशीन तसेच सोळा डंपर पीएमआरडीए कडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गाळ काढत असताना सध्या तलावात असलेले पाणी जनावरांच्या पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी याशिवाय तलावातील गाळ शेतकऱ्यांना द्यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. तलावातील गाळ काढल्यानंतर गावची भूजल पातळी वाढण्यासाठी ओढे व बंधाऱ्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गावकऱ्यांच्या इच्छेविरोधात येथे होणारी टाउन प्लानिंग स्कीम करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे ही
स्कीम करताना शेतकऱ्यांचा व जमीन मालकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही ही पालकमंत्र्यांनी या वेळी दिली.
पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी पीएमआरडीएच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी सुरज मांढरे यांनी तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली तसेच गाळ काढून झाल्यानंतर पावसाळ्यात या भागात वृक्ष लागवड करण्यासाठी ही जिल्हा परिषद पुढाकार घेईल असे सांगितले. गावकऱ्यांनी या तलावातील गाळ काढल्यानंतर आसपासच्या पाच ते सहा गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याची भावना व्यक्त केली.