पुणे-
अनेक व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी एखाद्या वास्तूला,रस्त्याला किंवा चौकाला आपल्या नातेवाईकांचे नाव देतात,मात्र एका महान नेत्याच्या स्मृतीदिनी त्यांनी केलेल्या कार्याचा फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे अनुकरणीय असल्याचे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.इतर नेत्यांना आपण माननीय किंवा अन्य विशेषणाने संबोधित करतो मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धेय अटलजी असे संबोधित केले जाते यातच त्यांची महानता अधोरेखित होते.अटलजी हे संघर्षाचे प्रतीक असून विपरीत परिस्थितीत त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आज भारतीय जनता पक्षाला स्वार्णिम दिवस आले आहेत असे ही त्या म्हणाल्या.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना प्रथम स्मृतिदिनी कश्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करता येइल याचा विचार करत असताना त्यांच्या कार्याचे स्मरण राहील असे काहीतरी करावे असा विचार मनात आला आणि कर्वेनगर मधील समर्थ पथावरील शक्ती ९८ चौकाचा इतिहास तत्कालीन वार्ड अध्यक्ष संतोष रासकर यांनी निदर्शनास आणून दिला.१९९८ साली अटलजीनी पोखरण येथे अणुचाचण्या घडविण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला आणि भारत हा अणवस्त्रधारी देश म्हणून गणला गेला असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.आमचे परमाणु परीक्षण हे विरोधकांवर वापरण्यासाठी नाहीत तर विरोधकांच्या अश्या कुठल्याही प्रयत्नाला प्रतिबंधीत करण्यासाठी आहेत असे अटलजी म्हणत – म्हणूनच आज त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी शक्ती ९८ चौकाच्या इतिहासाचा फलक लावून अटलजींच्या अतुलनीय कार्याचे स्मरण करत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक व कर्वेनगर वारजे प्रभाग समिती अध्यक्ष जयंत भावे,भाजयुमो चे शहर अध्यक्ष दीपकजी पोटे,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग कार्यवाह विनायक बेहेरे,प्रभाग १३ च्या अध्यक्ष गौरीताई करंजकर,सरचिटणीस राजेंद्र येडे,हडपसर मंडल विस्तारक कुलदीप सावळेकर,भाजयुमो सरचिटणीस पुनीत जोशी ,सुयश गोडबोले ,अजय काळे ,सुधीर फाटक ,संजय कबाडे ,विठ्ठल मानकर ,स्वातीताई हिर्लेकर ,अजय धोंगडे ,श्री.खाडिलकर,प्रदीप जोशी ,श्रीपाद गोहाड ,सुवर्णाताई काकडे ,अपर्णा लोणारे ,चंद्रकांत पवार ,सौ निशा वाड ,सौ शहा ,हेमंत भावे ,निशीकांत भोमे ,दिलीप उंबरकर ,चरणसिंग सहानी ,सतीश गायकवाड,जयेश सरनौबत,जगदीशजी डिंगरे ,सुनिल मिश्रा ,सागर देशपांडे ,माणिकताई दीक्षित,अजय आडकर ,श्री.मांगले ,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आपल्या लाडक्या नेत्याचे स्मरण करण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.
वक्ता दशसहस्त्रेषु असलेल्या अटलजींच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय लोटायचा अशी आठवण सांगताना भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी अटलजींच्या कवितांच्या पंक्ती उधृत करतानाच अटलजींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम हिंदुस्थानाचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत आहेत हीच अटलजीना सच्ची श्रद्धांजली असल्याचे मत व्यक्त केले.३७० व्या कलमापासून ,समान नागरी कायदा ,आसाम मधील घुसखोरांची हकालपट्टी,अयोध्येतील राममंदिर यासह अटलजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय प्रश्नां वरील जन आंदोलनात आम्ही सक्रिय होतो याची आठवण ही त्यांनी सांगितली.यावेळी जयंत भावे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे,दीपक पोटे ,मिताली सावळेकर व विनायक बेहेरे यांनीही मनोगत व्यक्त केले.तर संतोष रासकर यांनी भगवान क्षीरसागर उपमहापौर असताना या चौकाचे नामकरण केल्याची आठवण सांगितली.
कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले ,सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन गौरी करंजकर यांनी केले.