पुणे-२०१४ च्या निवडणुकीपूर्वी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रख्यात अभिनेता अमीर खान याच्या पाणी फौंडेशन च्या सत्यमेव वॉटर कप सोहळ्यात राजकीय रंग जुगलबंदी रंगविण्याचा चांगला प्रयत्न केला .जात पात ,गट तटाच्या लढाईत अडकलेला महाराष्ट्र पाणी जिरवण्याचे मात्र विसरून गेला असे या सर्व जुगलबंदीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्थित होते.
राज ठाकरे –
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.
अजित पवार –
आमिर जी तुम्ही खुप चांगलं काम करत आहात. परंतु कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन तुमच्यावर शिक्का मारून घेऊ नका. तुमच्यावर कोणाचा शिक्का नाही म्हणून ही जनता आज तुम्हाला प्रतिसाद देत आहे. असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमिर खान यांना दिला. तसेच काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, त्यांना केवळ सभा घेऊन जायच्या असतात असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
अजित पवार म्हणाले, आम्ही सर्व राजकीय पक्षाचा शिक्का असलेले कार्यकर्ते आहोत. आज जनता तुम्हाला प्रतिसाद देतीये कारण तुमच्यावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाही. येणारं वर्ष निवडणुकांचं असलं तरी तुमचा 2019 चा वॉटर कप झाला पाहिजे. राज्यातील काही धरणं आज 100 टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्यात अजूनही पाण्याची गरज आहे. भूगर्भातील पाणी वाढते तेव्हा शेतकरी जास्त पाणी लागणारी पिकं घेतात. त्यामुळे पीक पद्धतीचा विचार करणेही आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कसा होतो, हे पाहणं गरजेचं आहे. श्रमदान, लोकसहभागाचं सातत्य टिकलं पाहिजे. आमिर खान यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र निवडला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी सत्यमेव जयते हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची विनंती सुद्धा अजित पवार यांनी आमिर खान यांना केली. तसेच किरण राव करेल तेच गाव करेल अशी नवीन म्हण सुद्धा अजित पवार यांनी यावेळी तयार केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
पूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा अशी घोषणा देण्यात आली होती, परंतु गावागावांमध्ये इतके गटतट तयार करण्यात आले की या घोषणे ऐवजी लोक अडवा आणि एकमेकांची जिरवा असे वातावरण निर्माण झाले. परंतु पानी फाऊंडेशनने जाती धर्माच्या पुढे जात सर्वांना एकत्र करत पाणी अडवण्याचं आणि जिरवण्याचं काम केलं या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खान यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सध्याच्या सामाजिक परिस्तिथीवर मार्मिक भाष्य देखील केले.
जलसंधारण हे फक्त सरकारच्या भरोष्यावर होत नाही तर ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, म्हणून सरकारकडून जलयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली. अमिर खान यांनी ही योजना जन आंदोलनात परिवर्तित केली. शिवाजी महाराजांचे सैन्य हे अठरा पगड जातीचं सैन्य होतं. त्यांनी सर्वांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. अमिर खान यांनी सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत केलं. गावातल्या लहान असलेल्या माणसांनी मोठं काम करून परिवर्तन केलं आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिलं आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेलं. पिकांच पॅटर्न निश्चित करणं आवश्यक आहे. पूर्वी जलसंधारण म्हणजे नदी नाले केवळ खोल केले जायचे. परंतु पानी फाऊंडेशन ने शास्त्रीय पद्धतीने हे काम केले. वॉटर कप मध्ये आम्ही राजकारण आणणार नाही, पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खानला केली.