आता प्रमुख पाहुणे मिळेनात ..म्हणून रखडलेत 17 पुरस्कारांचे वितरण ; हाय रे महापालिका …
पुणे -गेल्यावर्षी अमिताभ बच्चन ,सचिन तेंडूलकर अशा बड्या दिग्गजांची नावे घेवून गणेशोत्सव शताब्दी वर्ष साजरे करू पाहणाऱ्या महापालिकेला ना बच्चन मिळाले आणि ना तेंडूलकर हाती लागले. ना त्याची कुठल्या पुस्तकात नोंद झाली .ढोलताशांचा तमाशा झाला , थीम सॉंग ने १८ लाख ओरबाडले, आजूबाजूला चिकटलेल्या मुंगळ्यांच्या सराईत करामतींमुळे .. असा अर्ध्यावर डाव मोडल्यासारखा झाला … एकीकडे गेल्या वर्षाच्या गणेशोत्सवाचां असा अनुभव गाठी असताना आता केवळ प्रमुख पाहुणे मिळेनात .. आणि मिळाले तर त्यांच्या तारखा जुळेनात..म्हणून दिग्गजांच्या नावाने दिले जाणारे महापालिकेचे 17 पुरस्कार रखडले असल्याची माहीती येथे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली .
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वांचा महापालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा खंडित झालेला मार्ग मोकळा झाला असला तरी रखडलेल्या पुरस्कारांच्या वितरणाला मात्र मानापमानाचे ‘ग्रहण ‘ लागले आहे.प्रमुख पाहुणे कोण ? यावरून आता राजकारण सुरु झाल्याने विविध पुरस्कारांच्या वितरणासाठी ‘ तारीख पे तारीख ‘ चा कारभार सुरु झाला आहे. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून तात्काळ या पुरस्कारांचे वितरण सुरु करून महनीय व्यक्तींच्या कार्याप्रती आदर राखावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहराला अनेक महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वे लाभली आहेत . गेल्या ७० वर्षात त्यांच्या कार्याप्रती आदर आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या- त्या महनीय व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येतो,तोही तरतुदीनुसार मात्र राज्यशासनाच्या एका परिपत्रकामुळे या परंपरेत खंड पडण्याची स्थिती ओढवली आणि आठ – नऊ महिने या पुरस्कारांचे वितरण थांबले.राज्यशासनाच्या परिपत्रकाचा आणि न्यायालयाचे निर्देश पुढे करून पुरस्कारांचे वितरण रोखण्यात आल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कायद्यातील तरतुदींकडे वारंवार लक्ष वेधून हे पुरस्कार सुरु करण्याची मागणी केली होती आणि तसा ठरावही दिला होता.मुख्यसभेच्या मान्यतेने हे रखडलेले पुरस् कार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , पं रोहिणी भाटे , संत जगनाडे महाराज, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, स्वरभास्कर आदी गतवर्षी रखडलेले आणि यंदाचे १७ पुरस्काराचे वितरण आता होणार अशी चिन्हे दिसत असताना मानापमानाचे आणि श्रेयावरून ;तसेच प्रमुख पाहुणे यावरून राजकारण सुरु झाले आहे त्यासाठी सदस्यांच्या अनुपस्थितीचे कारण रेटून पुरस्कारांचे वितरण लांबणीवर टाकले जात आहे.
याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, ज्या महनीय व्यक्तींचा सन्मान केला जातो ,त्यांच्या कार्याप्रती आदर राखला जाणे आवश्यक आहे. रखडलेल्या पुरस्कारांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालिकेकडून मानपत्र देऊन या पुरस्कारांचे वितरण होणार आहे असे असताना आता या पुरस्कारांचे वितरण पक्षीय कारणामुळे जर लांबणीवर टाकले जात असतील तर ते योग्य नाही. पुण्यतिथी – जयंती दिनी आणि ठरलेल्या कालावधीतच या पुरस्कारांचे वितरण होणे आवश्यक आहे आणि एका वेळी एकच पुरस्कार प्रदान केला जावा तरच त्या- त्या पुरस्कारांचे महत्व जोपासले जाईल अन्यथा एका वेळी दोन -दोन पुरस्कार देण्याचा घाट घातल्यास त्या- त्या महनीय व्यक्तींचा अनादर होईल. कोणतेही पक्षीय राजकारण न करता रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण ठरलेल्या तारखांनुसारच व्हावे अशी मागणीही आबा बागुल यांनी केली आहे.