पुणे :कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकसित होणे आवश्यक असून आपल्या स्वभावात व विचारप्रक्रियेत सकारात्मकतेच्या दृष्टीने बदल केल्यासच आपला यशस्वी बनण्याचा प्रवास सुरु होतो, असे मत सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते योगेश अशोक उंडे यांनी व्यक्त केले. ते चिंचवड येथे यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चॅम्पियन प्रवृत्ती’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यतः कोणत्याही व्यक्तीची प्रवृत्ती ही अनुवांशिकता,सभोवतालचे वातावरण आणि मानसिकता या तीन गोष्टींमुळे घडत असते. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, प्रत्येकाला स्वत:चे असे कर्म आहे. त्याने स्वत:च्या कर्माला पूर्णत्व दिलं पाहिजे. यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न येणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी सुरुवातीला स्वतःमध्ये बदल करण्याची मानसिकता होणे गरजेचे आहे.कोणतेही नेमून दिलेले काम निर्धारित वेळेतच पूर्ण करण्याचा ध्यास असायला हवा, नेहमी आधीपेक्षा उत्तम आणि सर्वोत्तमतेच्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे. लक्षात घ्या आपले बोलणे, एखाद्या घटनेवर आपली काय प्रतिक्रिया आहे यावरूनच आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. त्यामुळे सर्वात मुळाशी फक्त आणि फक्त आपली ‘प्रवृत्ती’ आहे. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला ‘चॅम्पियन प्रवृत्ती’ चा अंगीकार करायला हवा. स्वतःला सतत, वारंवार आपण जिंकणारच आहोत असे सांगितले पाहिजे.