- फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहा वाचून दाखवला.
मुंबई- मनसुख हिरेन यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचे तक्रार अर्ज जशास तसे वाचून दाखवले. विमला हिरेन यांना संशय आहे, की एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनीच मनसुख यांची हत्या केली. देवेंद्र फडणवीस यांनी हे वाचताच सभागृहात गदारोळ उडाला. तर सत्ताधाऱ्यांनी प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यामुळे भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. अशात सभागृहाचे कामकाज 4 वेळा तहकूब कारावे लागले.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचला. “माझ्या पतीची चौकशी वझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. एवढेच नव्हे तर हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती” असे हिरेन यांच्या पत्नी म्हणाल्या. “वझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वझे यांना कोण वाचवत आहे?” असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, “मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे 2017 चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी 40 लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचे नाव धनंजय विठ्ठल गावडे तर दुसऱ्याचे नाव सचिन हिंदुराव वाझे असे आहे.”
सचिन वाझे कोणत्या पक्षाचे? त्यांना तत्काळ अटक करा.
दरम्यान, सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस संतापले. सचिन वझे यांना तत्काळ अटक करा. सचिन वझेचे काय हे आम्हाला कळाले पाहिजे. सचिन वझे कोणत्या पक्षाचे होते? त्यांना मनसुख हिरेन प्रकरणी तत्काळ अटक करा. त्यांना पाठीशी का घातले जात आहे? असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.
दरम्यान अन्वय नाईक हत्या प्रकरण फडणवीस यांनी आपल्या कारकीर्दित दाबले असा घणाघाती आरोप गृह मंत्री यांनी केला तेव्हा अशा धमक्या देऊन वाझेला वाचवु पहाता काय ? कोणती चौकशी लावायची ते लावा, आम्ही घाबरत नाही असे फडणवीस म्हणाले.
या वेळी महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव हे सुद्धा आक्रमक झालेले दिसले.त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. भास्कर जाधव म्हणाले की, 2017 साली देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले. आता ठाकरे सरकार नाईक यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन याप्रकरणाची चौकशी करत आहे. त्यावेळेस सचिन वझे प्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.

