मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत युती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अमोल काळे यांना निवडून आणले. शरद पवार यांच्या या खेळीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आज स्वत: शरद पवार यांनी आपल्या या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
आम्ही खेळात पडत नाही
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, आशिष शेलार जवळपास ५ वर्षांपुर्वीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. खेळाडूंना प्रोत्साहित करणे, त्यांना खेळासाठी विविध सुविधा देणे, हे आमचे काम आहे. त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाहीत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारखे उभं आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणे आणि त्यांना तयार करणे यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचे काम जमणार नाही. ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचे आहे.
लोकांना ‘हे’ माहितच नाही
शरद पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी क्रिकेटशी संबंधित संस्थांमध्ये आहे. त्यामध्ये मीच काय इतरही राजकारणी कधी राजकारण आणत नाहीत. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर राहत. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आता माहिती प्रसारण मंत्री असलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आल नव्हत. फक्त आताच याची चर्चा होत आहे. मात्र, याठिकाणी आम्ही कधीही राजकारण आणत नाही.
यंदाचे वर्ष चांगले जाईल
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. यावरही शरद पवारांनी भाष्य केले. शरद पवार म्हणाले, परतीच्या पावसाने नुकसान झाले असले तरी यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे आताचे पिक गेले तरी पुढील दोन पिके चांगली येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाच वर्षे चांगले जाईल, अशी आशा आहे.