पुणे: 2014 पासून नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर खुश होऊन देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव नागरिकांना मिळायला लागला, असे कंगना राणावतला म्हणायचे असेल तर ते बरोबर आहे.पण त्यासाठी 1947 च्या स्वातंत्र्यावर टीका करण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना देण्यात आली.
सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली, ” स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल तर ते स्वातंत्र्य असू शकतं का ? 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले” या वक्तव्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात येते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना कंगना राणावतच्या या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, कंगना राणावतच्या भावना नेमक्या काय आहेत मला माहीत नाही. परंतु तिचे वाक्य पूर्णतः चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
देशात नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो. दोन वेळचे जेवण मिळत नाही असा माणूसच आता देशात राहिला नाही. 105 रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे, घरं मिळतायत, स्वच्छतागृह अशी मोठी यादी आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर खूष होऊन नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत असेल तर ते बरोबर आहे, पण.. १९४७ च्या स्वातंत्र्याबद्दल असे बोलण्याचा अजिबात अधिकार तिला नाही .
एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अमानवीय
महाविकास आघाडी सरकारच्या निर्दयतेचा कळस
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्यदयतेचा कळस गाठला आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं, हे अतिशय अमानवीय आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एसटी कर्मचारी न्याय्य हक्कासाठी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपाची भूमिका आहे. आम्ही कोणत्याही श्रेयासाठी या आंदोलनाला साथ देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. कारण त्यांना जनतेच्या मनातलं कळायचं. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्यदयतेचा कळस गाठला. आपल्या हक्कासाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं, हे अतिशय अमानवीय आहे.
ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी आम्ही जे आदिवासींना जे लाभ मिळतात, ते धनगर समाज बांधवांना लागू केले. त्यानुसार राज्य सरकारने ज्या सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात. त्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचे जाहीर करुन, हा प्रश्न सोडविण्यास सुरुवात करावी.
मालेगावमध्ये सुरू असलेल्या प्रकारावर बोलताना श्री. पाटील म्हणाले की, जगभरात कुठेही काही घडलं, तर त्यावर देशात मूठभर लोकांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे न कळणारे आहे. त्रिपुरातील घटनेवरुन काही मुठभर लोक मालेगावमधील देशभक्त मुस्लिम समाजबांधवांना बदनाम करण्याचं काम करत आहेत.
हडपसर जमीन प्रकरणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे स्वागत करताना श्री. पाटील म्हणाले की, “माझ्या खोट्या सही, शिक्का आणि महसूल नंबरचे आदेश काढून जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला. यानंतर मी स्वतः या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, हे प्रकरण अतिशय गंभीर असून, याची सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच अशाप्रकारे खोट्या आदेशाद्वारे असे प्रकार झाल्या का? याचा शोध घेण्याची विनंती केली होती. कारण उद्या विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही नावे असे बनावट आदेश काढून जमीन बळकावण्याचा प्रकार होऊ शकतो.”
हडपसर जमीन बळकाणाऱ्या प्रकरणात फौजदारी कारवाई झाली असून, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना अजून काही करण्याचे बाकी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.